मध्य प्रदेशमधील पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या आरोप-प्रत्यरोपांसह आक्षेपार्ह वक्तव्यांमुळे तेथील राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे दिसत आहे. माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी भाजपा उमेदवार इमरती देवी यांच्या बद्दल केलेल्या विधावरून सुरू झालेला गदरोळ अद्याप शमलेला नसताना, आता मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या मंत्रिमंडळातील अन्न व नागरी पुरवठामंत्री बिसाहूलाल सिंह यांनी अनूपपुर येथील काँग्रेसचे उमेदवार विश्वनाथ सिंह यांच्या पत्नी बद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचे समोर आले आहे.

मंत्री बिसाहूलाल सिंह यांनी म्हटले की, “विधानसभा निवडणुकीचा जेव्हा फॉर्म भरल्या जातो तेव्हा संपूर्ण संपत्तीचे विवरण दिले जाते. सर्व माहिती दिली जाते. मात्र विश्वनाथ सिंह यांनी त्यांची पहिली पत्नी व जी सद्यस्थितीस आहे, याबद्दल माहिती दिली नाही. त्यांनी हे सांगितले नाही की माझी एक पत्नी आहे ती विवाहीत आहे. त्यांच्याकडून माहिती घ्या की तुमची पहिली पत्नी कुठं आहे. हे देखील सांगा की माझी दुसरी पत्नी आहे, तर दोन पत्नी आहेत.”

आणखी वाचा- कमलनाथ यांनी ‘त्या’ वक्तव्यावर मागितली माफी, म्हणाले…

बिसाहूलाल यांच्या विधानावरून काँग्रेसने भाजपावर निशाणा साधला आहे. काँग्रेसने म्हटले आहे की, काल कमलनाथ यांच्या एका शब्दाला पकडून मुख्यमंत्री शिवराज सिंह यांनी मौन बाळगले. आता ते काय करतील? आता शिवराज सिंह यांनी बिसाहूलाल यांच्यावर कठोर कारवाई करायला हवी.

आणखी वाचा- सरळ सरळ माफी का मागत नाहीत; मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांचा सवाल

तर, काँग्रेसचे उमेदवार विश्वनाथ सिंह यांनी म्हटले की, बिसाहूलाल निवडणूक हारत आहेत. त्यामुळे ते अशाप्रकारची वक्तव्य करत आहेत. ती माझी धर्मपत्नी आहे. मी त्यांच्याशी विवाह केला आहे आणि माझी दोन मुलं आहेत. मी त्यांना सांगू इच्छितो की मी १५ वर्षे अगोदर त्यांच्याशी विवाह केला होता. मी बिसाहूलाल यांच्याविरोधात मानहानीचा दावा ठोकणार आहे.