मध्य प्रदेश काँग्रेसचा आरोप
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी स्वत:ची खुर्ची शाबूत ठेवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सत्काराचा घाट घातला असल्याचा आरोप राज्य काँग्रेसने केला आहे. मोदी गुरुवारी मध्य प्रदेशच्या दौऱ्यावर येणार आहेत.
पीक विमा योजनेची अंमलबजावणी केल्याबद्दल शेतकऱ्यांच्या हस्ते मोदी यांचा सत्कार करण्याचे मध्य प्रदेश सरकारने ठरविले आहे. राज्यात आर्थिक स्थिती बेताची असताना, पीक विमा योजनेसाठी राज्याचा वाटा देण्याची ऐपत नसताना अशा प्रकारे मोदी यांच्या सत्कारावर कोटय़वधी रुपयांची उधळण्याची गरज काय, असा सवाल राज्य काँग्रेसने केला आहे.
पीक विमा योजनेची अंमलबजावणी केल्याच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या हस्ते मोदी यांचा सत्कार करणे यामागे केवळ आपली खुर्ची शाबूत ठेवणे हा चौहान यांचा एकमेव उद्देश आहे, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अरुण यादव म्हणाले.