केंद्राताली मोदी सरकारवर चीन आणि कृषी कायद्यांवरून टीका करणाऱ्या काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना मध्य प्रदेशचे गृहमंत्री आणि भाजपाचे नेते नरोत्तम मिश्रा यांनी लक्ष्य केलं आहे. राहुल गांधी यांनी चीनसंदर्भात एक विधान केलं होतं. त्या विधानाचा हवाला देत मिश्रा यांनी राहुल गांधींना सवाल केला आहे. "इतक्या चांगल्या दर्जाची नशा कुठे करतात, माहिती नाही?," असं मिश्रा पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले. "काँग्रेसचं सरकार असतं, तर १५ मिनिटात चीनला हाकललं असतं", असं काँग्रेसचे नेते राहुल गांधी शेती वाचवा रॅलीला संबोधित म्हणाले होते. राहुल गांधी यांच्या या विधानावरून मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी टीका केली आहे. "दहा दिवसांत कर्जमाफी, १५ मिनिटांत चीनला साफ करणार. मी त्या गुरूंना नमन करतो ज्यांनी राहुल गांधींना शिकवलं. मला एक समजत नाही की, इतक्या चांगल्या दर्जाची नशा हे कोठून आणतात?," असं म्हणत मिश्रा यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला. #WATCH: Dus din mein karz maaf, 15 minute mein China saaf, main toh us guru ko naman kar raha hoon jisne inko padhaya hai. Itni achhi quality ka ye nasha laate kahan se hain?: Madhya Pradesh Home Minister Narottam Mishra on Rahul Gandhi's remark pic.twitter.com/xrX47Wgs87 — ANI (@ANI) October 8, 2020 शेती वाचवा यात्रेत राहुल गांधी नेमकं काय म्हणाले होते? शेती वाचवा रॅलीला संबोधित करताना राहुल गांधी म्हणाले होते,"पंतप्रधान नरेंद्र मोदी भित्रे आहेत. त्यांनी चीनला आपल्या देशाची जमीन बळकावण्याची मुभा दिली. काँग्रेसचं सरकार असतं, तर १५ मिनिटात चीनला हाकललं असतं. संपूर्ण जगात एकमेव असा देश आहे की, ज्या देशात चीनचं सैन्य आलं. भारताची जमीन हडपली. मोदींनी सांगितलं की, 'भारताच्या कोणत्याही जमिनीवर चीननं कब्जा केलेला नाही.' मात्र सगळ्या देशाला माहित आहे पंतप्रधान काय बोलले होते," असं राहुल गांधी म्हणाले होते.