भारतीय नौदलातून निवृत्त झालेली विमानवाहू युद्धनौका आएनएस विराटच्या तोडकामाला सुरुवात झाली आहे. मात्र, हे काम त्वरीत थांबवा आणि आयएनएस विराट वाचवा अशी मागणी शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे.

चतुर्वेदी यांनी पत्रात म्हटलं, “गुजरातच्या अलंग येथे ऐतिहासिक आयएनएस विराटच्या तोडकामाला सुरुवात झाल्याचे मी ऐकले आणि अतिव दुःख झाले. सन २०१३ पर्यंत ३० वर्षे देशासाठी सेवा देणाऱ्या या ऐतिहासिक युद्धनौकेने दुसऱ्या महायुद्धातही महत्वाची भूमिका बजावली होती. ऑपरेशन ज्युपिटर आणि ऑपरेशन परक्रमामध्येही ही युद्धनौका तैनात होती.”

जलमेव यश्य, बलमेव तस्य’ हे आयएनएस विराटचं ब्रीदवाक्य आहे. याचा अर्थ ‘जो समुद्रावर नियंत्रण ठेवतो, तो सामर्थ्यवान आहे’ असा होतो. मात्र, आज ही युद्धनौका शक्तीहीन झाली आहे. त्यामुळे तिचे जतन होण्याऐवजी तिला तोडून तिचे भाग सुटे करुन ते भंगारात विकले जाणार आहेत. भारताच्या नौदलाचा इतिहास जाणून घेण्यासाठी ही ऐतिहासिक युद्धनौका नागरिकांसाठी अनमोल ठेवा आहे. त्यामुळे आयएनएस विराटचे म्युझियममध्ये रुपांतर करण्यात यावे, त्यासाठी संरक्षण मंत्रालयाकडून ‘ना हरकत प्रमाणपत्र’ देण्यात यावे. यासाठी मंत्रालयाने तात्काळ हस्तक्षेप करण्यात यावा अशी मागणी यावेळी चतुर्वेदी यांनी केली.

आपल्या पुढील पिढीला भारताच्या इतिहासाची माहिती न होऊ देताच आपण तो पुसून टाकणं हे लाजिरवाणं आहे. या युद्धनौकेच्या जतनासाठी सरकारकडून उच्च इच्छाशक्तीची आवश्यकता आहे, तेव्हाच ती वाचवली जाऊ शकते. राज्य सरकार या युद्धनौकेच्या जनतासाठी सहाकार्य करण्यास तयार होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आयएनएस विराटची प्रतिकृती ही मुंबई शहराला अर्पण केल्याचेही चतुर्वेदी यांनी सांगितले.

भारताचा राष्ट्रवाद, देशभक्ती आणि अभिमान यांची आठवण म्हणून आयएनएस विराट पुन्हा एकदा जिवंत होऊ शकते, श्वास घेऊ शकते. त्यासाठी आपण तिचे जतन करुयात हीच माझी नम्र विनंती आहे, असे भावनिक आवाहनही खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी संरक्षण मंत्र्यांना केले आहे.