मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असली, तरी मुंबई ते अहमदाबाद या देशातील पहिल्या व महत्त्वाकांक्षी बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या कामाचा आरंभ मोदी-शहांची कर्मभूमी असलेल्या गुजरातमधूून केला जाणार आहे. जपानचे पंतप्रधान शिंझो अॅबे बुधवारी भारताच्या दौऱ्यावर येत असून तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समवेत ते अहमदाबादच्या साबरमती रेल्वे स्थानकाजवळ या प्रकल्पाचे भूमिपूजन करतील. जपानच्या सहकार्याने सुरू होत असलेल्या या प्रकल्पाची किंमत १.१ लाख कोटी रुपये इतकी आहे. याशियावय अन्य दहा सामंजस्य करारांवरही मोदी-अॅबे भेटीत स्वाक्षऱ्या होतील. हा प्रकल्प डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. मात्र केंद्र सरकार हे काम १५ ऑगस्ट २०२२ पर्यंत पूर्ण करेल, असा विश्वास रेल्वे मंत्री पीयुष गोयल यांनी व्यक्त केला. हा प्रकल्प चालवण्यासाठी ४००० जणांना प्रत्यक्ष रोजगार मिळेल तर २०,००० जणांना अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होईल, असेही गोयल यांनी स्पष्ट केले. गोयल म्हणतात.. जगात अन्यत्र अनेक वर्षांपूर्वी कालबाह्य़ झालेल्या तंत्रज्ञानावर भारतीय रेल्वे चालत आहे. मात्र बुलेट ट्रेनच्या आगमनाने ही परिस्थिती बदलेल. कालांतराने या तंत्रज्ञानाची देशांतर्गत निर्मिती होऊ लागल्यावर ते स्वस्तात उपलब्ध होईल. नंतर ते आपण अन्य देशांना निर्यातही करू शकू. मारुती कार प्रकल्पाने ३० वर्षांपूर्वी देशाच्या वाहन उद्योगावर जो परिणाम घडवला तसाच परिणाम या प्रकल्पाने देशाच्या वाहतूक क्षेत्रावर होईल. मुंबई ते अहमदाबाद हे ५०० किलोमीटरचे अंतर अवघ्या दोन तासांत पार करता येईल. त्याने या क्षेत्रातील विमान वाहतुकीवरही परिणाम होईल. सरकार या प्रवासाचा खर्च नागरिकांना परवडेल अशा मर्यादेत ठेवेल.