प्रसिद्ध संगीतकार नरेंद्र भिडे यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. ते ४७ वर्षांचे होते. गुरुवार( १० डिसेंबर) पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ‘देऊळ बंद’, ‘पाऊलवाट’ अशा अनेक मराठी चित्रपटातील गाणी त्यांनी संगीतबद्ध केली होती.

नरेंद्र भिडे यांच्या निधनामुळे मराठी कलाविश्वावर एकच शोककळा पसरली आहे. सकाळी ९.३० वाजता पुण्यातील डॉन स्टुडिओमध्ये त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनसाठी ठेवण्यात येणार असून ११ वाजता वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी व दोन मुले आहेत.

सिव्हिल इंजिनिअरची पदवी घेतलेल्या संगीतकार नरेंद्र भिडे यांनी अनेक नाटक, मालिका, मराठी चित्रपट संगीतबद्ध केले होते. त्यांनी महम्मद हुसेन खान साहेब, स्वरराज छोटा गंधर्व, बाळासाहेब मते, शैला दातार, सुधीर दातार, सुहास दातार यांच्याकडे भारतीय शास्त्रीय संगीताचे धडे गिरवले होते. तर, हेमंत गोडबोले यांच्याकडे त्यांनी पाश्चिमात्य संगीताचं शिक्षण घेतलं होतं. नरेंद्र भिडे यांनी अनेक नाटक, मालिका, चित्रपट, जिंगल्सच्या माध्यमातून संगीतक्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली होती.

नरेंद्र भिडे यांचे गाजलेले चित्रपट –

‘सरसेनापती हंबीरराव’ (आगामी), ‘मुळशी पॅटर्न’, ‘रानभूल’, ‘त्या रात्री पाऊस होता’, ‘हिप हिप हुरे’, ‘पाऊलवाट’, ‘अनुमती’ , ‘दिल ए नादान’ (बायोस्कोप), ‘देऊळ बंद’, ‘कलम ३०२’, ‘साने गुरुजी’, ‘शासन सिंहासन’, ‘चौदहवी का चाँद’, ‘आंधळी कोशिंबीर’, ‘आघात’, ‘शेवरी’, ‘रमा माधव’, ‘एलिझाबेथ एकादशी’, ‘यशवंतराव चव्हाण’, ‘हरिशचंद्राची फॅक्टरी’, ‘मालक’, ‘मसाला’, ‘समुद्र’, ‘चाँद फिर निकला’ (हिंदी) याशिवाय ‘श्वास’, ‘सरीवर सरी’, ‘माती माय’ सह अनेक चित्रपटांना पार्श्वसंगीत.

नाटके-

‘कोण म्हणत टक्का दिला?’, ‘माकडाच्या हाती शॅम्पेन’, ‘काटकोन त्रिकोण’, ‘चिरंजीव आईस’, ‘चांदणे शिंपीत जा’, ‘हमीदाबाईची कोठी’, ‘जोडी तुझी माझी’, ‘एक झुंज वाऱ्याशी’, ‘गोडी गुलाबी’, ‘फायनल ड्राफ्ट’, ‘लव्ह बर्डस’ , ‘व्हाईट लिली अँड नाईट रायडर’, ‘अलीबाबा आणि ४० चोर’, ‘छापा काटा’, ‘आषाढातील एक दिवस’, ‘संगीत गर्वनिर्वाण’,

मालिका –
‘अवांतिका’, ‘ऊन पाऊस’, ‘साळसुद’, ‘घरकुल’, ‘मानो या ना मानो’, ‘पळसाला पाने पाच’, ‘भूमिका’, ‘पेशवाई’, ‘नूपुर’, ‘अबोली’, ‘श्रावण सरी’, ‘सुर – ताल’, ‘कॉमेडी डॉट कॉम’, ‘फुकट घेतला शाम’, ‘अमर प्रेम’.

नरेंद्र भिडेंना मिळालेले पुरस्कार
झी गौरव (पाच वेळा), सह्याद्री सिने अवॉर्ड, राज्य नाट्य पुरस्कार ( दोन वेळा), व्ही. शांताराम पुरस्कार, श्रीकांत ठाकरे पुरस्कार, म. टा. सन्मान, राज्य चित्रपट पुरस्कार आदि विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.