एमआयएमचे वारीस पठाण यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी त्यांचा शिरच्छेद करा, ही कृती करणाऱ्याला आम्ही ११ लाखांचे इनाम देऊ अशी घोषणा हक-ए-हिंदुस्थान मोर्चा या मुस्लीम संघटनेने केली आहे. मुजफ्फरपूर, येथील कंपनी बाग रोडवरच्या हक-ए-हिंदुस्थान मोर्चा या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी वारीस पठाण यांचा पुतळाही जाळला. वारीस पठाण देशद्रोही आहेत असं हक-ए-हिंदुस्थानच्या राष्ट्रीय संयोजक तमन्ना हाश्मी यांनी म्हटलं आहे.

काय आहे प्रकरण?
गुलबर्गा येथील सभेत बोलताना वारीस पठाण यांचा तोल गेला. “१०० कोटी हिंदू जनतेवर १५ कोटी मुस्लीम भारी पडतील. आम्हाला स्वातंत्र्य दिले जात नसेल तर ते मिळवावे लागेल” असा इशारा दिल्याने वारीस पठाणवर चहूबाजूंनी टीका झाली. वारीस पठाण यांच्या वक्तव्याचे पडसाद देशभरात उमटले. पक्षातील कुरबुरीनंतर अखेर असदुद्दीन ओवेसी यांनी वारीस पठाण यांच्याविरोधात कारवाईचे पाऊल उचललं. वारीस पठाणला मीडियाशी बोलण्यास मनाई करण्यात आली. पक्ष परवानगी देत नाही तोपर्यंत वारीस पठाण यांना प्रसारमाध्यमांशी बोलता येणार नाही असं ओवेसी यांनी म्हटलं आहे.

दरम्यान वारीस पठाण यांच्या वक्तव्याचा निषेध मुस्लीम संघटनांनीही नोंदवला आहे. तुम्ही ज्या १५ कोटी मुस्लिमांमध्ये आम्हाला घेऊ पाहात आहात ते आम्ही नाही असंही काही मुस्लीम बांधवांनी म्हटलं आहे. आज हक-ए-हिंदुस्थान मोर्चा या संघटनेने वारीस पठाण यांचा शिरच्छेद करणाऱ्याला ११ लाखांचे इनाम जाहीर केले आहे. तसंच वारीस पठाण यांच्या तोंडी देशद्रोह्यांची आणि पाकिस्तानाची भाषा आहे. ही बाब आम्ही कधीही सहन करणार नाही असंही तमन्ना हाश्मी यांनी म्हटलं आहे.