बकरी ईदच्या दिवशी देण्यात येणाऱ्या प्राणांच्या बळींविरोधात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा भाग असलेल्या मुस्लिम राष्ट्रीय मंचाने भूमिका घेतली आहे. बकरी ईदच्या निमित्ताने देण्यात येणाऱ्या प्राण्यांच्या बळींना मुस्लिम राष्ट्रीय मंचाने विरोध दर्शवला आहे. बकरी ईदला दिल्या जाणाऱ्या प्राण्यांच्या बळींबद्दल लोकांच्या मनात एक अंधश्रद्धा असल्याचे मुस्लिम राष्ट्रीय मंचाचे उत्तर प्रदेशचे सहसंयोजक खुर्शीद आगा यांनी म्हटले आहे. 'मुस्लिम लोक स्वत:ला प्रामाणिक म्हणवतात. मात्र प्रत्यक्षात मुस्लिमांमधील अनेक लोक अल्लाच्या मार्गावरुन चालताना भ्रमित झाले आहेत,' असेदेखील त्यांनी पुढे बोलताना म्हटले. 'बळी देणे योग्य नसताना अशा प्रकारची कृती का केली जाते?,' असा सवाल मुस्लिम राष्ट्रीय मंचाच्या खुर्शीद आगा यांनी उपस्थित केला. यावेळी त्यांनी अयोध्येतील बाबरी मशिदीच्या वादग्रस्त ढाच्याबद्दलदेखील भाष्य केले. 'जिथे दंगली होतात, तिथे नमाज केला जात नाही, अशी कुराणची शिकवण आहे. मग अशा वादग्रस्त जागेवर मशीद कशी काय उभारली जाऊ शकते?', असा प्रश्न त्यांनी विचारला. या प्रसंगी बोलताना राष्ट्रीय मुस्लिम मंचाचे पूर्व उत्तर प्रदेशचे संयोजक ठाकूर राजा रईस यांनीदेखील बकरी ईदविषयी त्यांचे विचार स्पष्ट केले. 'जर हजरत इब्राहिमकडून कोणत्याही प्राण्याचा बळी देण्यात आला नाही, तर मग बकरी ईदच्या दिवशी मुस्लिम समाजाकडून प्राण्यांचा बळी का दिला जातो?', असा प्रश्न रईस यांनी विचारला. बकरी ईदला बळी देण्याच्या नावाखाली प्राण्यांची हत्या केली जात असल्याचेही ते पुढे बोलताना म्हणाले. 'पशू-पक्षी, झाडे-झुडपे अल्लाची कृपा असून त्यांच्यावर दया करा, असे पैगंबर मोहम्मद सांगतात. पशू-पक्षी, झाडे-झुडपे यांच्यावर दया केल्यास तुमच्यावरील अल्लाची कृपा कायम राहिल,' असे ठाकूर राजा रईस यांनी म्हटले. यावेळी बोलताना गायीचा बळी देणे देणे हराम असल्याचे अवध प्रांताचे संयोजक सय्यद हसन कौसर यांनी सांगितले. 'तीन तलाकप्रमाणेच बकरी ईदच्या दिवशी प्राण्यांचा बळी देणे ही एक वाईट प्रथा आहे. आपण सगळे २१ व्या शतकात आहोत. त्यामुळे आता समाजामधून चुकीच्या प्रथा हद्दपार करायला हव्यात,' असे कौसर यांनी म्हटले.