देशभक्तीसाठी मुस्लिमांना पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रमाणपत्राची गरज नसल्याचा टोला माजी परराष्ट्रमंत्री सलमान खुर्शीद यांनी लगावला आहे. मुस्लिम नागरिक हे देशभक्त असल्याचे मोदींना कदाचित आताच समजले असावे पण, त्यांच्या कोणत्याही प्रमाणपत्राची गरज नाही. देशाच्या स्वातंत्र्यासाठी इतर धर्माच्या नागरिकांप्रमाणे मुस्लिम नागरिकांचेही मोठे योगदान आहे, असेही खुर्शीद पुढे म्हणाले.
भारतातील मुस्लिम ‘अल-कायदा’च्या तालावर नाचणारे नाहीत-पंतप्रधान
‘सीएनएन’ वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ‘भारतीय मुस्लीम हे ‘अल-कायदा’च्या तालावर नाचणारे नाहीत. ते देशासाठी जगतील आणि देशासाठीच मरतील’ असे उद्गार मोदींनी काढले होते. यावर खुर्शीद यांनी टोलेबाजी केली. मुस्लिमांचे हसू कोण करत आहे? भाजपमध्ये योगी आदित्यनाथ, गिरीराज, प्रवीण तोगडिया व अध्यक्ष अमित शहा यांच्यासह अन्य नेत्यांच्या बाबतीत पक्षात काय होत आहे? असा खोचक सवालही खुर्शीद यांनी यावेळी उपस्थित केला.