कोलकाता : गुमनामी बाबा म्हणजे नेताजी सुभाषचंद्र बोसच होते असे मानले जाते, पण हे गूढ आता अधिक गहिरे झाले आहे, कारण कोलकात्यातील सीएफएसएल प्रयोगशाळेने गुमनामी बाबाच्या दातांचा इलेक्ट्रोफेरोग्राम हा उपलब्ध नसल्याचे म्हटले आहे. इलेक्ट्रोफेरोग्राममध्ये अशा माहितीचा असा संच असतो जी डीएनए क्रमवारी यंत्राने तयार केलेली असते व ती माहिती व्यक्तीच्या डीएनए ओळख चाचणीसाठी वापरली जात असते. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याबाबत विशेष प्रेम असलेल्या सयाक सेन यांनी पाठवलेल्या माहिती अधिकार अर्जाला दिलेल्या उत्तरात सीएफएसएलचे मुख्य माहिती अधिकारी बी. पी. मिश्रा यांनी म्हटले आहे की, या प्रकरणी इलेक्ट्रोफेरोग्राम अहवाल कोलकात्याच्या सीएफएसएल प्रयोगशाळेकडे उपलब्ध नाही. ४ फेब्रुवारी २०२० रोजी दिलेल्या उत्तरात त्यांनी म्हटले आहे की, यावर जर अपील करायचे असेल तर ते सीएफएसएल कोलकाता या संस्थेच्या अपील अधिकाऱ्यांकडे करावे लागेल. तीस दिवसातच असे अपील करता येईल. विष्णू सहाय कमिशनने नेताजी बोस यांच्या गूढ मृत्यूची माहिती घेण्याचा प्रयत्न केला होता, त्यात त्यांनी कोलकाताच्या केंद्रीय न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या (सीएफएसएल) अहवालाचा दाखला देऊन असे म्हटले होते की, गुमनामीबाबा म्हणजे सुभाषचंद्र बोस नव्हते. आता सीएफएसएल प्रयोगशाळेने असा कुठला अहवालच नसल्याचे सांगितल्याने हे गूढ वाढले आहे. विष्णू सहाय आयोगाने गुमनामी बाबा हे सुभाषचंद्र बोस नव्हते असा जो निष्कर्ष अहवालाच्या आधारे काढला होता, तसा अहवाल अस्तित्वात नसल्याचे स्पष्ट झाले आहे. गुमनामी बाबा आणि आरोप-प्रत्यारोप * उत्तर प्रदेशात फैजाबाद येथे राहणाऱ्या गुमनामी बाबा यांच्या तीन दातांची डीएनए चाचणी कोलकात्याच्या सीएफएसएलने केली होती. गुमनामी बाबा यांचे १६ सप्टेंबर १९८५ मध्ये निधन झाले होते. त्यांच्या दोन दातांची तपासणी हैदराबादच्या सीएफएसएल प्रयोगळशाळेत करण्यात आली. हैदराबादच्या चाचणीत कुठलाही निर्णायक निष्कर्ष काढला गेला नाही, पण कोलकाता येथील चाचणीत गुमनामी बाबा म्हणजे सुभाषचंद्र बोस नव्हते असे सांगण्यात आले होते. * सेन यांनी म्हटले आहे की, मुखर्जी आयोगाने ज्या डीएनए अहवालाच्या आधारे निष्कर्ष काढला तो बनावट होता. त्यात इलेक्ट्रोफेरोग्राम नव्हता. त्यामुळे गुमनामी बाबांचे गूढ पुन्हा कायम आहे. * नेताजींचे नातेवाईक व भाजप नेते चंद्रकुमार बोस यांनी हे आरोप फेटाळले आहेत. * नेताजींचा इलेक्ट्रोफेरोग्राम अहवाल आमच्याकडे नाही असे कोलकात्याच्या सीएफएसएल प्रयोगशाळेने म्हटले आहे याचा अर्थ तसा अहवालच अस्तित्वात नाही असा होत नाही त्यामुळे सेन यांचे आरोप निराधार आहेत असे बोस यांनी म्हटले आहे. * विष्णू सहाय आयोगाचा अहवाल उत्तर प्रदेश विधानसभेत गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये मांडलेला होता व त्यात गुमनामी बाबा म्हणजे सुभाषचंद्र बोस नव्हते, असे स्पष्ट करण्यात आले होते. बोस यांचा तैवान येथे विमान अपघातात १८ ऑगस्ट १९४५ रोजी मृत्यू झाला होता, पण काहींच्या मते ते अपघातातून वाचले होते व नंतर ब्रिटिशांच्या ताब्यात जायला लागू नये म्हणून ओळख लपवून राहात होते.