श्रीराम क्षत्रिय तर भगवान कृष्ण ओबीसी होते, अशा शब्दांत त्यांना जातीची लेबलं लावून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संविधानकर्ते डॉ. बाबसाहेब आंबेडकर हे ब्राह्मण असल्याचे वादग्रस्त विधान गुजरात विधानसभेचे अध्यक्ष राजेंद्र त्रिवेदी यांनी केले आहे. शनिवारी गांधीनगर येथे ब्राह्मण बिजनेस समिटमध्ये ते बोलत होते. त्रिवेदी म्हणाले, ब्राह्मण समाज कधीही सत्तेचा भुकेला नव्हता उलट त्यांनी कित्येक राजांना त्यांच्या यशामध्ये योगदान दिले आहे. चंद्रगुप्त मौर्य, श्रीराम आणि भगवान कृष्ण यांच्या यशातही ब्राह्मणांचेच योगदान होते. ब्राह्मणांनीच देवांना बनवले आहे. श्रीराम हे क्षत्रिय होते मात्र, त्यांना देव बनवण्यामागे ब्राह्मण ऋषी, मुनींचे योगदान होते. तसेच कृष्ण ओबीसी होते त्यांना देव बनवण्यामागे ब्राह्मण सांदिपनी ऋषींचे योगदान होते. ब्राह्मणांनी संस्कृती भाषेचे रक्षण केले असून मत्सकन्येचे पुत्र भगवान व्यासांना देखील ब्राह्मणांनीच देव बनवले. ब्राह्मण हे दुधावरची साय असून ज्यावेळी दुध उकळते तेव्हा त्याच्या वर ही साय तयार होते, अशा प्रकारे ब्राह्मणांचे महत्व विशद करताना आपल्या भाषणाच्या शेवटी त्रिवेदी म्हणाले, जो कोणी शिकतो तो ब्राह्मणच असतो. त्यामुळे मला हे म्हणणे चुकीचे वाटत नाही की, आंबेडकर हे देखील ब्राह्मणच होते. आंबेडकर त्यांच्या आडनावामुळे ब्राह्मण आहेत. ज्या शिक्षकांनी त्यांना हे नाव दिले ते ब्राह्मण होते. त्यामुळे हे म्हणणे चुकीचे ठरणार नाही की सर्व शिक्षित लोक हे ब्राह्मणच असतात. याच संदर्भाने आदरणीय मोदीजी हे देखील ब्राह्मणच आहेत, हे सांगायला मला अभिमान वाटतो, असे यावेळी त्रिवेदी म्हणाले. त्रिवेदी यांनी ज्या ब्राह्मण बिजनेस समिटमध्ये आपली भुमिका मांडली या कार्यक्रमात गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी आणि उपमुख्यमंत्री नितीन पटेल हे देखील उपस्थित होते. यावेळी आपण स्वतः ब्राह्मण असून याचा आपल्याला अभिमान असल्याचे त्रिवेदी यावेळी म्हणाले.