राज्यसभेत प्रचंड गदारोळात कृषि विषयक दोन विधेयके मंजूर झाली. ही विधेयकं राज्यसभेत मांडल्यानंतर काँग्रेससह विरोधी पक्षांनी सरकारला प्रचंड विरोध केला. सभागृहात विरोधकांचा गदारोळ सुरू असतानाच ही विधेयकं आवाजी मतदानानं मंजूर करण्यात आली. या विधेयकांच्या मंजूरीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून शेतकऱ्यांना ‘एमएसपी’बद्दल ग्वाही दिली.

राज्यसभेत शेतकरी उत्पादने व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन व सुविधा), शेतकरी (हक्क आणि सुरक्षा) दर हमी ही दोन्ही विधेयके आवाजी मतदानानं मंजूर करण्यात आली. ही विधेयक केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी सभागृहात मांडली. चर्चेवेळी विरोधकांनी विधेयकांनी प्रचंड विरोध करत घोषणाबाजी केली. या गदारोळातच विधेयक मंजूरीसाठी आवाजी मतदान घेण्यात आलं.

ही विधेयक मंजूर झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून शेतकऱ्यांना एमएसपी व्यवस्था कायम राहणार असल्याची ग्वाही दिली. “मी आधीही बोललो आहे. पुन्हा एकदा सांगतो एमएसपी व्यवस्था कायम राहिल. सरकारी खरेदी कायम राहिल. आम्ही इथे शेतकऱ्यांच्या सेवेसाठी आहोत. आम्ही अन्नदात्यांच्या मदतीसाठी शक्य होईल तितके प्रयत्न करू आणि त्यांच्या येणाऱ्या पिढ्यांचं जगणं अधिक सुखकर करू,” असं मोदी यांनी म्हटलं आहे.

“कृषि क्षेत्राला आधुनिक तंत्रज्ञानाची तातडीनं गरज आहे. कारण यामुळे कष्ट घेणाऱ्या शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे. ही विधेयके मंजूर झाल्यामुळे शेतकऱ्यांना भविष्यातील तंत्रज्ञान सहजपणे पोहोचणार आहे. यातून केवळ उत्पादन वाढणार नाहीये. तर इतरही चांगले परिणाम दिसून येणार आहेत. हे पाऊल स्वागत करण्यासारखं आहे,” असं मोदी म्हणाले.

“दशकांपासून आपले शेतकरी बंधू भगिनी अनेक प्रकारच्या बंधनांची जखडले गेले आहेत. अडचणींचा सामना करावा लागत होता. संसदेत मंजूर करण्यात आलेल्या विधेयकांमुळे अन्नदात्यांना स्वातंत्र्य मिळालं आहे. यामुळे शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्यास ताकद मिळेल आणि त्यांची समृद्धी निश्चित होईल,” असं मोदी म्हणाले.