पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी म्हणजेच सात जुलै रोजी आपल्या दुसऱ्या कार्यकाळामध्ये पहिल्यांदाच मंत्रिमंडळ विस्तार करतील, असं सांगितलं जात आहे. केंद्रातील मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भातील चर्चा सध्या राजकीय वर्तुळामध्ये आहे. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार मंत्रिमंडळामध्ये मोठे फेरबदल होणं अपेक्षित आहे. विशेष म्हणजे या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये सर्व राज्यामधील निवडणुका आणि इतर राजकीय समिकरणं विचारात घेत मंत्रिमंडळाची मोट बांधली जाणार आहे. एकूण २० नेत्यांचा मंत्रिमंडळामध्ये सामावेश केला जाण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. याच पार्श्वभूमीवर देशातील आठ राज्यांचे राज्यपालांच्या नियुक्तीमध्ये फेरबदल करण्यात आलेत. उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या राज्याला सर्वाधिक प्रतिनिधित्व केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारामध्ये मिळण्याची शक्यता आहे. मोदींच्या मंत्रिमंडळामध्ये नक्की कोणाचा समावेश केला जाणार हे अजून स्पष्ट झालेलं नसतं तरी काही माजी मुख्यमंत्र्यांची आणि उपमुख्यमंत्र्यांची नाव चर्चेत आहेत. नक्की कोण आहेत हे मंत्री जाणून घेऊयात…

नारायण राणेंचं नाव आघाडीवर…

राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे हे सोमवारी दिल्लीला गेले असून राणे यांचा केंद्रीय मंत्रीमंडळात समावेश होण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. राणे हे राष्ट्रीय अध्यक्ष असणाऱ्या नड्डा यांची भेट घेणार असल्याचं सांगितलं जात आहे. नारायण राणे हे सध्या महाराष्ट्रात सत्तेत असणाऱ्या महाविकास आघाडी आणि त्यातही खास करुन शिवसेनेचे सर्वात मोठे विरोधक मानले जात असल्याने त्यांच्या गळ्यात केंद्रीय मंत्रीपदाची माळ पडण्याची शक्यता व्यक्त केली जातेय.

नक्की वाचा >> मोदींच्या मंत्रिमंडळात शिवसेनेला संधी?; महाराष्ट्रात उद्धव राहणार CM तर फडणवीस केंद्रात जाण्याची चर्चा

शाह यांनी केलेलं राणेंचं कौतुक…

७ फेब्रवारी रोजी खासदार नारायण राणे यांच्या लाइफ टाइम मेडिकल कॉलेजच्या उद्घाटनासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह ओरस पडवे येथे आले होते. या उद्घाटन प्रसंगी शाह यांनी दिलेल्या भाषणामध्ये राजकीय टोलेबाजी करण्याबरोबरच राणे यांचं कौतुकही केलं होतं. अनेकजण नारायण राणे यांच्या नेतृत्वासंदर्भात वेगवेगळ्या गोष्टी सांगतात. मात्र जेव्हा मी नारायण राणे यांच्याकडे पाहतो तेव्हा मला त्यांच्यामध्ये जेथे जेथे अन्याय होतो तेथे ठामपणे भूमिका घेणारा आणि स्पष्टपणे बोलणारा नेता दिसतो, अशा शब्दांमध्ये अमित शाह यांनी नारायण राणेंचं कौतुक केलं होतं. पुढे बोलताना त्यांनी, सार्वजनिक आयुष्यामध्ये हे खूप महत्त्वाचं असतं कारण जी व्यक्ती स्वत:विरोधात होणाऱ्या अन्यायाविरोधात लढू शकत नाही ती जनतेविरुद्धच्या अन्यायाविरोधात आवाज उठवू शकत नाही असं म्हटलं होतं. जेव्हा जेव्हा नारायण राणे यांच्या राजकीय वाटचालीमध्ये त्यांच्यावर अन्याय झाल्यासारखं त्यांना वाटलं त्यांनी भविष्याचा जास्त विचार न करता त्या अन्यायाविरोधात भूमिका घेतली आहे. त्यामुळेच राणेंच्या राजकीय प्रवासामध्ये फार वळणं असल्याचं दिसून येतं , असं शाह म्हणाले होते.

नक्की पाहा >> “नाना पटोलेंनी देशाचा GDP मायनस सात केला”; नारायण राणेंचा व्हिडीओ व्हायरल

नारायण राणेंवर तुमच्या पक्षाकडूनही अन्याय झाला तर काय करणार?, असा प्रश्न मला काही पत्रकारांनी विचारल्याचंही शाह यांनी या भाषणात म्हटलं. या प्रश्नाला उत्तर देताना, “मी त्यांना राणेंवर भाजपामध्ये अन्याय होणार नाही,” असं सांगितल्याचंही शाह यांनी नमूद केलं. भारतीय जनता पार्टीला नारायण राणेंसारख्या नेत्याला कशाप्रकारचा सन्मान द्यायचा आणि त्यांचा मान कसा राखायचा हे ठाऊक आहे असंही शाह यांनी यावेळी सांगितलं. भाजपा नारायण राणेंवर अन्याय करणार नाही. राणेंचा निश्चित सन्मान पक्षाकडून केला जाईल. तसेच कसा सन्मान करायचा याचा निर्णय पक्ष घेईल, असे अमित शाह यावेळी म्हणाले.

नारायण राणे यांनी २००५ साली उद्धव ठाकरेंशी असलेल्या मतभेदामुळे शिवसेना सोडून काँग्रेसमद्ये प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांनी २०१७ साली स्वाभिमानी पक्षाची स्थापना केलेली. २०१८ साली भाजपाच्या पाठींब्याने ते राज्यसभेवर निवडून गेले. त्यानंतर त्यांनी ऑक्टोबर २०१९ मध्ये निलेश आणि नितेश या आपल्या दोन्ही मुलांसोबत भाजपामध्ये अधिकृतपणे प्रवेश केला. मागील काही काळापासून करोना परिस्थिती हाताळ्यात महाविकास आघाडी सरकारला अपयश आल्याची टीका राणेंकडून केली जात आहे.

नक्की पाहा >> व्हायरल व्हिडीओ : मोदी चूकून म्हणाले, “पॉझिटिव्ह केसेस वाढवण्यावर भर द्या” 

इतर मंत्री कोण?

नारायण राणेंबरोबरच आसामचे माजी मुख्यमंत्री सरवानंद सोनोवाल यांचीही मोदींच्या मंत्रिमंडळामध्ये वर्णी लागण्याची शक्यता आहे. तसेच बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील मोदींनाही नरेंद्र मोदी आपल्या मंत्रीमंडळामध्ये संधी देण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. हे सर्व मंत्री आज किंवा उद्यापर्यंत दिल्लीमध्ये पोहचणार असल्याने यांच्या नावांचा मंत्रिमंडळात समावेश केला जाण्याची शक्यता वाढलीय. बिहारमधून केवळ सुशील मोदींचं नाव नसून पशुपति पारस यांच्या नावाचीही संभाव्य मंत्र्यांच्या यादीमध्ये चर्चा आहे. एलजेपीच्या पारस आणि चिराग पासवान यांच्या गटांमध्ये वर्चस्वासाठी युद्ध सुरु आहे. मात्र पाच खासदारांचा पाठिंबा असणाऱ्या पारस यांच्या पारड्यात मोदी मत टाकत त्यांना संधी देण्याची शक्यता अधिक आहे. या बातमीमुळे पाटण्याबरोबरच हाजीपूरमध्येही चर्चांना उधाण आलं आहे.

नक्की वाचा >> नितीन गडकरींनी सांगितला YouTube वरुन होणाऱ्या कमाईचा आकडा; म्हणाले, “आज मला महिन्याला…”

कोणत्या राज्याला किती मंत्रीपदं मिळण्याची शक्यता?

उत्तर प्रदेश : विधानसभेची निवडणूक असणाऱ्या उत्तर प्रदेशला तीन ते चार मंत्रीपद मिळू शकतात. यामध्ये अपना दलच्या अनुप्रिया पटेल यांनाही संधी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जातेय.

बिहार : जनता दल युनायटेडमधून आर. सी. पी. सिंह आणि संतोष कुशवाह किंवा ललन सिंह यांच्यापैकी एखाद्या नेत्याची मोदींच्या मंत्रिमंडळात वर्णी लागू शकते.

मध्य प्रदेश : मध्य प्रदेशमधून ज्योतिरादित्य शिंदे यांच्या नावावर केवळ औपचारिक शिक्कामोर्तब होणं बाकी असल्याची चर्चा मध्य प्रदेश भाजपामध्ये आहे. तसेच राज्यातील भाजपाचे माजी अध्यक्ष आणि जबलपुरचे खासदार राकेश सिंह यांचं नावही चर्चेत आहे.

महाराष्ट्र : महाराष्ट्रामधून नारायण राणेंबरोबरच काँग्रेसमधून भाजपात आलेल्या रणजीत नाईक निंबाळकर आणि हिना गावित यांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे. हिना गावित यांचे वडील विजय कुमार राष्ट्रवादीमध्ये होते आणि ते राज्यात मंत्री होऊन गेले आहेत. याचबरोबर महाराष्ट्रामधील बीडच्या खासदार डॉ. प्रितम मुंडे, छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असणाऱ्या उदयनराजे भोसले यांच्या नावाचीही चर्चा पहायला मिळत आहे.

आसाम आणि पश्चिम बंगाल : पूर्वेकडी राज्यांबद्दल बोलायचं झाल्यास आसाम आणि पश्चिम बंगालमधील खासदारांना मोदींच्या मंत्रीमंडळात संधी मिळण्याची शक्यता आहे. भाजपाचा मित्र पक्ष असणाऱ्या आसाम गण परिषदलाही मंत्रीपद दिलं जाऊ शकतं. तर दुसरीकडे पश्चिम बंगालमधील मतुआ समाजाचे शान्तनू ठाकूर आणि अनुसूचित जाती जमातींमध्ये मोठा प्रभाव असणाऱ्या निशीथ प्रामाणिक यांच्या गळ्यात मंत्रीपदाची माळ पडू शकते.

लडाख आणि ओदिशा : लडाखमधील भाजपाचे खासदार जाम्यांग शेरिंग नाम्ग्याल यांना मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे. तसेच ओदिशा, राजस्थान आणि जम्मू काश्मीरमधील एक दोन नेत्यांना केंद्रांत संधी मिळू शकते.