केंद्रातील सत्ताधारी यूपीए सरकार अत्यंत दुबळं असल्याची टीका गुजरातचे मुख्यमंत्री नरेद्र मोदी यांनी सोमवारी केली. जगातील वेगवेगळ्या देशांना भारताकडून खूप साऱया अपेक्षा आहेत. मात्र, दुबळ्या यूपीए सरकारमुळे सर्वच जण चिंतीत आहेत, असाही हल्ला मोदी यांनी चढविला. अमेरिकेतील विविध १८ शहरांतील अनिवासी भारतीय नागरिकांशी मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला. 
गुजरातमध्ये गेल्या १२ वर्षांच्या कालावधीमध्ये केलेल्या विकासाबद्दलही मोदी यांनी यावेळी भाष्य केले. गुजरातचे विकासाचे मॉडेल हे सर्वसमावेशक असल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले, गुजरातमध्ये गेल्या १२ वर्षांच्या काळात झालेल्या प्रगतीची त्याआधीच्या ४० वर्षांतील प्रगतीशी तुलना केल्यावर तुम्हाला कळेल की आम्ही विकास एका नव्या उंचीवर नेऊन ठेवलाय. सध्या मी जरी गुजरातचे प्रतिनिधीत्व करीत असलो, तरी सर्वप्रथम मी एक भारतीय आहे. दुबळ्या केंद्र सरकारमुळे देशाची सर्वच आघाड्यांवर झालेल्या पिछेहाटीमुळे मला खूप काळजी वाटते.
यूपीए सरकारच्या काळात भ्रष्टाचाराच्या विविध घटनांमुळे सामान्यांचा सरकारवरचा विश्वास उडाला आहे. तो विश्वास आता पुन्हा मिळवावा लागेल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.