पंतप्रधानांचा आरोप; त्रिपुरातील सभेत डाव्यांवर टीका

भाजपला सत्तेवरून हटवण्यासाठी विरोधक कोणत्याही थराला जातील, अगदी पाकिस्तानच्या सुरातसूर मिसळतील असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी येथील सभेत केला. डाव्या आघाडीच्या सरकारची २५ वर्षांची सत्ता हटवून त्रिपुराच्या जनतेने देशापुढे उदाहरण घालून दिल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.

ममता बॅनर्जी यांचा तृणमूल काँग्रेस पक्ष त्रिपुरात शिरकाव करण्याचा पुरेपूर प्रयत्न करत आहे, मात्र लोकांनी त्याला थारा दिलेला नाही.  जनतेने डाव्या आघाडीचा अन्याय सहन केला आणि भाजपच्या उदयासाठी वाट पाहिली. पक्षाला राज्यात सत्ता दिल्याबद्दल त्यांनी जनतेचे आभार मानले.

रालोआ सरकार आपल्या शेजारच्या देशाच्या भूमीवर जाऊन दहशतवाद्यांचा नायनाट करत असताना हे लोक पाकिस्तानची प्रशंसागीते गात होते. या देशाच्या शत्रूंना चोख प्रत्युत्तर देऊन मी योग्य तेच करत नाही काय, असा प्रश्न पंतप्रधानांनी सभेतील लोकांना उद्देशून विचारला. काँग्रेसने ५०-६० पानांचा ढोंगीपणाचा दस्तऐवज जारी केला आहे. त्यात त्यांनी मध्यमवर्गीयांचा एकदाही उल्लेख केलेला नाही, अशा शब्दांत मोदी यांनी काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर टीका केली.