औषध नियंत्रक संस्थेने कोव्हिशिल्ड व कोव्हॅक्सिन या दोन लशींना आपत्कालीन वापरासाठी मान्यता दिल्यानंतर आता जगातील सर्वात मोठी कोविड १९ प्रतिबंधक लसीकरण मोहीम भारतात सुरू होणार आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

या लशी भारत निर्मित असून त्यात आपले वैज्ञानिक व तंत्रज्ञ यांनी मोठी भूमिका पार पाडली, अशा शब्दात पंतप्रधानांनी प्रशंसा केली. ते म्हणाले, की जगातील सर्वात मोठा कोविड १९ लसीकरण कार्यक्रम भारतात सुरू होत असून त्यात वैज्ञानिक व तंत्रज्ञ यांच्या परिश्रमांचे मोठे योगदान आहे. भारताच्या औषध महानियंत्रकांनी सोमवारी ऑक्सफर्डची कोविड १९ लस म्हणजे सीरमची कोव्हिशिल्ड व भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन या दोन लशींना आपत्कालीन वापरासाठी मान्यता दिली आहे.

राष्ट्रीय हवामानशास्त्र बैठकीत मोदी यांनी सांगितले, की भारतात तयार होणाऱ्या उत्पादनांना जगात केवळ मागणीच आहे असे नाही तर ती उत्पादने जगाने स्वीकारली आहेत. गुणवत्ता व संख्या यात गुणवत्ता जास्त महत्त्वाची असून आत्मनिर्भर भारत संकल्पनेचा पाठपुरवा करताना भारतीय उत्पादनांची गुणवत्ता वाढत आहे.

कुठल्याही प्रागतिक समाजात संशोधन महत्त्वाचे व प्रभावी असते. त्याचे परिणाम व्यावसायिक व सामाजिक पातळ्यांवर होत असतात, त्यातून विचाराचा दृष्टिकोन व्यापक बनू शकतो. आपल्या देशातील सेवा दर्जेदार आहेत. त्यातून जगात भारत बलशाली होत आहे.

भूतकाळाने आपल्याला विज्ञान व तंत्रज्ञानावर लक्ष केंद्रित करायला शिकवले. तंत्रज्ञानातून नवे उद्योग उभे राहिले, तसेच संशोधन पुढे गेले. या सगळ्या चक्रातूनच भारत पुढे जात आहे. आपल्याला सगळे जग भारतीय उत्पादनांनी व्यापून टाकायचे नाही, पण भारतीय उत्पादनांनी जगातील लोकांची मने जिंकली पाहिजेत. त्यासाठी संख्येपेक्षा गुणवत्तेला महत्त्व अधिक आहे. – पंतप्रधान नरेंद्र मोदी</p>