खालच्या जातीतून आल्यामुळे माझे राजकारण गांधी परिवाराला नीज राजकारण वाटत असल्याचे प्रत्युत्तर भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी दिले. ट्विटवर ट्विट करून मोदींनी प्रियांका गांधींच्या टीकेला प्रत्युत्तर दिले.
अमेठी लोकसभा मतदारसंघात सोमवारी जाहीर सभा घेऊन मोदींनी गांधी घराण्यावर कडवी टीका केली होती. त्यानंतर प्रियांका गांधींनी लगेचच मोदींच्या टीकेला प्रत्युत्तर दिले. अमेठीच्या भूमीवर मोदींनी माझ्या शहीद झालेल्या वडिलांचा अपमान केला आहे. अमेठीतील जनता त्यांना कधीच माफ करणार नाहीत. त्यांच्या नीच राजकारणाला अमेठीतील कॉंग्रेसचे कार्यकर्तेच उत्तर देतील. अमेठीतील एका एका बूथवरून त्यांना उत्तर देण्यात येईल. असे प्रियांका गांधी यांनी म्हटले होते. त्यालाच मोदींनी मंगळवारी सकाळी प्रत्युत्तर दिले. खालच्या जातीतून आल्यामुळेच त्यांना माझे राजकारण नीच दर्जाचे असल्याचे वाटते आहे.