मन की बात कार्यक्रमात घोषणा

स्वच्छ भारत कार्यक्रमाअंतर्गत १ मे ते ३१ जुलै दरम्यान विशेष उन्हाळी आंतरवासीयता योजना राबवण्यात येईल यात चांगले काम करणाऱ्या विद्यार्थ्यांना पुरस्काराने गौरवण्यात येईल शिवाय विद्यापीठ अनुदान आयोगाकडून श्रेयांकही दिले जातील अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ कार्यक्रमात केली.

त्यांनी सांगितले की, शिक्षण, क्रीडा  व जल मंत्रालयाने आंतरवासीयता कार्यक्रमाची आखणी केली असून एनसीसी, एनएसएस मधील तरुण, नेहरू युवा केंद्राचे विद्यार्थी व महाविद्यालयीन विद्यार्थी यांनी यात भाग घ्यावा. शिक्षण मंत्रालयाने स्वच्छ भारत उन्हाळी आंतरवासीयता कार्यक्रम २०१८ साठी पात्र विद्यार्थ्यांकडून अर्ज मागवले आहेत. महाविद्यालय व विद्यापीठ पातळीवर चांगले काम करणाऱ्यांना राष्ट्रीय पातळीवर पुरस्कार दिले जातील. हा आंतरवासीयता कार्यक्रम म्हणजे महात्मा गांधी यांना त्यांच्या दीडशेव्या जयंतीपूर्वीच मोठी श्रद्धांजली ठरेल. या योजनेत विद्यार्थी एक किंवा अनेक खेडी दत्तक  घेऊन ग्रामीण भागात स्वच्छतेचे कार्यक्रम करू शकतील. १ मे ते ३१ जुलै दरम्यान संबंधित मुलांनी १०० तासांचे काम करायचे आहे. त्याचे आयोजन महाविद्यालये व विद्यापीठांनी करणे अपेक्षित आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाकडून विद्यार्थ्यांना या कामासाठी श्रेयांकही बहाल केले जातील. जलसंवर्धनाच्या कामात प्रत्येक भारतीयाने योगदान दिले पाहिजे असे आवाहन त्यांनी केले.  पारंपरिक जलसंवर्धन पद्धतींवर भर देण्याची गरज प्रतिपादन करताना त्यांनी सांगितले की, मनरेगाअंतर्गत जलसंवर्धनासाठी कामे करण्यात आली त्याशिवाय सरासरी ३२ हजार कोटी रुपये खर्च करण्यात आले. रमझान व बौद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा देतानाच त्यांनी राष्ट्रकुल स्पर्धेतील पदक विजेत्यांचे कौतुक केले.

तंदुरुस्त भारत

मोदी यांनी सांगितले की, तंदुरुस्त भारत योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. अनेक लोकांनी फिटनेस मंत्रा- फिट इंडिया अंतर्गत त्यांच्या कहाण्या समाजमाध्यमातून मांडल्या आहेत. यातील व्हॉलीबॉल व लाकडी वस्तूंच्या मदतीने व्यायामाच्या व्हिडिओ अक्षय कुमारने शेअर केल्या आहेत. त्यामुळे युवकांना प्रोत्साहन मिळेल. योग ही भारतात फिट इंडिया चळवळ व्हावी कारण त्यासाठी फार पैसा लागत नाही अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

गुड न्यूज इंडिया

डीडीन्यूज लाइव्हवर गुड न्यूज इंडिया हा कार्यक्रम आहे त्याचा उल्लेख करून मोदी यांनी सांगितले की, सामाजिक स्थित्यंतर होत आहे दिल्लीतील एका युवकाने रस्त्यावरील मुले व झोपडपट्टीवासीयांना शिकवण्याचे काम हाती घेतले आहे. बागेश्वर येथील शेतकरी मांडवा, चौलाई, मका, बार्ली यासारखी पिके पर्वतीय भागात घेतात,  पण त्यांना दर मिळत नव्हता आता त्यांनी त्यापासून बिस्किटे तयार केली आहेत व त्यांची शेती तोटय़ातून नफ्यात येत आहे.

अणुचाचण्यांना वीस वर्षे पूर्ण

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना बौद्ध पौर्णिमेला ११ मे १९९८ रोजी अणुचाचण्या करण्यात आल्या. त्यात  आपल्या वैज्ञानिक व खंबीर नेत्यांनी एक उंची दाखवून दिली. जय जवान, जय किसान, जय विज्ञान असा मंत्र वाजपेयी यांनी दिला होता. आता अणुचाचणीला यावेळी वीस वर्षे होत आहेत. अटलजींच्या त्या मंत्राने आधुनिक,  शक्तीमान व स्वयंपूर्ण भारताची निर्मिती केली आहे.