स्वयंसेवी संस्था आणि काळाबाजार करणाऱ्यांवर नरेंद्र मोदींचा आरोप
एक चहावाला पंतप्रधान झालेला काही लोकांना पाहवत नसून मला बदनाम करण्याचे आणि सरकार अस्थिर करण्याचे कारस्थान स्वयंसेवी संस्था आणि काळा बाजार करणाऱ्यांकडून सुरू आहे, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे केली. या असंतुष्ट यंत्रणेसमोर आपण झुकणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
छत्तीसगडच्या दौऱ्यानंतर ओदिशातील बारगड येथे रविवारी आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. येथे त्यांनी ‘रुर्बन मिशन’ या महत्त्वाकांक्षी योजनेची घोषणा केली. या योजनेंतर्गत देशातील ३०० गावांचा शहरी केंद्रांमध्ये विकास केला जाणार आहे. केंद्र सरकार देशातील गोरगरीब, पीडित आणि दलित जनतेच्या विकासासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी मोदी म्हणाले की, सरकारने युरियावर कडुनिंबाचे विलेपन करण्याचा निर्णय घेतल्याने काळा बाजारात गुंतलेल्या व्यक्तींना सरकारी युरियाचा काळा बाजार करून तो खासगी रासायनिक कारखान्यांना पुरवणे अवघड झाले आहे. त्यांचा हा उद्योग बंद पडल्याने साहजिकच ते आणि त्यांच्या पाठीशी असलेले कारखानदार माझ्यावर व सरकारवर नाराज आहेत. तसेच अनेक स्वयंसेवी संस्थांना परदेशांतून आर्थिक मदत मिळते, त्यात गैर काही नाही. पण सरकारने त्या निधीचा हिशेब मागायला सुरुवात करताच या संस्थाही सरकारच्या विरोधात गेल्या आहेत. देशाला पैसा कोठून येतो आणि कोठे खर्च होतो हे कळाले पाहिजे. त्यामुळेच या असंतुष्ट घटकांनी सरकारविरोधी कट-कारस्थाने आणि आंदोलने चालवली आहेत.’

घरबांधणीसाठी ६ लाखांपर्यंत कर्ज
‘प्रधानमंत्री आवास’ योजनेंतर्गत दुर्बल घटक व अल्प उत्पन्न घटकांना ३० ते ६० चौरस मीटर एवढय़ा क्षेत्रफळापर्यंत नवीन घर बांधण्यासाठी किंवा जुन्या घराची वाढ करण्यासाठी बँकांमार्फत अत्यल्प व्याज दराने ६ लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळणार आहे. या कर्जावरील ६.५ टक्के व्याज केंद्र सरकार भरेल. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मुंबईसह राज्यातील ५१ शहरांमध्ये ही योजना लागू होईल.

गरिबांसाठी सहा वर्षांत पाच कोटी घरे
येत्या २०२२ पर्यंत गरिबांसाठी पाच कोटी घरे बांधण्यात येतील अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. प्रधानमंत्री आवास योजनेचा कोनशिला समारंभ त्यांच्या हस्ते झाला त्यावेळी ते बोलत होते.