देशात करोनाची तिसरी लाट येणार असल्याचे संकेत तज्ञांनी दिले आहेत. तसेच या लाटेचा लहान मुलांना सर्वाधिक धोका असल्याचे बोलल्या जात आहे. या पार्श्वभूमीवर आगामी काळात मुलांना करोनापासून वाचविण्याची गरज आहे. अशा परिस्थितीत सर्व तयारी अगोदरच पूर्ण करावी लागेल, असे म्हणत कॉंग्रेस नेते राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. करोना काळात विरोधकांकडून मोदी सरकारवर जोरदार टीकासत्र सुरु आहे. राहुल गांधी सतत मोदी सरकारवर शाब्दीक हल्ले करत आहेत.

राहुल गांधी म्हणाले, “येणाऱ्या काळात मुलांना करोनापासून संरक्षित करणे आवश्यक आहे. अशा परिस्थितीत बालरोग सेवा आणि लस उपचार प्रोटोकॉल आधीच तयार करणे आवश्यक आहे. भारताच्या भविष्यासाठी मोदी सिस्टिमला झोपेतून उठवणे आवश्यक आहे”

आणखी वाचा- करोना बळींचा उच्चांक! देशात गेल्या २४ तासांत सर्वाधिक रुग्णांचा मृत्यू


यापुर्वी देखील राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदींवर टीका केली होती. ‘पीएमकेअरचे व्हेंटिलेटर आणि पंतप्रधान यांच्यात अनेक समानता आहेत. हे दोघेही जास्त खोटा प्रचार करतात – हे दोघेही आपले काम करण्यात अपयशी ठरतात – दोघांनाही सापडणे कठीण आहे.’, असे राहुल गांधी म्हणाले होते.

आणखी वाचा- Coronavirus : भारत सरकारच मोठ्या प्रमाणात लसींचं उत्पादन का घेत नाही?; उच्च न्यायालयाचा प्रश्न

देशात करोना बळींचा उच्चांक! 

देशात करोनाचा कहर सुरुच आहे. गेल्या काही दिवसांपासून देशात करोना रुग्णसंख्येत लक्षणीय घट दिसून येत आहे. मात्र, मृत्यू्चे प्रमाण अद्याप चिंतेचा विषय आहे. भारतात, गेल्या २४ तासात करोना संक्रमणामुळे ४३२९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एका दिवसात मृत्यू झालेल्या रुग्णांची ही सर्वाधिक संख्या आहे. आज (मंगळवार) आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासात करोनाचे २,६३,५३३ नवीन रुग्ण आढळले आहेत.

देशात गेल्या २४ तासात २,६३,५३३ नवीन करोना रुग्ण आढळले. तर ४,२२,४३६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच ४,३२९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.