जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या १२ दिवसांनी भारतीय हवाई दलाने पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी ठिकाणांवर मोठी कारवाई केली आहे. भारतीय हवाई दलाने दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करत चोख उत्तर दिलं आहे. दरम्यान सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निगराणीखाली हल्ला करण्यात आला. नरेंद्र मोदी स्वत: अॅक्शन रुममध्ये हजर होते.

भारतीय वायूसेनेच्या मिराज २००० या लढाऊ विमानांनी पहाटे साडेतीनच्या सुमारास पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या तळावर १००० किलोग्रॅम वजनाचे बॉम्ब फेकले. १२ मिराज विमानांनी पाक हद्दीत घुसून दहशतवादी तळावर हल्ले केले. या हल्ल्यात जैश ए मोहम्मदची अल्फा ३ कंट्रोल रूम पूर्णपणे उद्धवस्त झली. या हल्ल्यात जवळपास ३०० दहशतवादी ठार करण्यात आले आहेत. ठार करण्यात आलेल्यांमध्ये जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहरचा मेहुणा युसूफ अझहरचाही समावेश आहे.

भारताने केलेल्या या हल्ल्यावर नरेंद्र मोदींनी राजस्थानातील चुरुमध्ये रॅलीत बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. हा देश सुरक्षित हातांमध्ये आहे याचा देशवासियांना विश्वास असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. मोदी म्हणाले, मी देशवासियांना विश्वास देतो की, देश सुरक्षित हातांमध्ये आहे. पक्षापेक्षा आम्ही देशाला प्राधान्य देतो. देशासाठी प्राणार्पण करणाऱ्या जवानांना शतशः प्रणाम.

यावेळी त्यांनी एक कवितादेखील बोलून दाखवली. ‘सौगंध मुझे इस मिट्टी की, मै देश नही मिटने दूंगा, मैं दैश नही रुकने दुंगा, मैं देश नही झुकने दुंगा मेरा वचन है भारत माँ को, तेरा शीष नही झुकने दुंगा जाग रहा है देश मेरा, हर भारतवासी जितेगा’, ही कविता बोलून त्यांनी आपण देशाच्या सुरक्षेसाठी कटिबद्ध असल्याचं सांगितलं.