जम्मू-काश्मीरमध्ये भाजप आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यावर जसे अनेकांना आश्चर्य वाटले होते. त्याचप्रमाणे आसाममध्ये भाजपचे सरकार सत्तेवर येणे हे त्यांच्यासाठी आश्चर्यकारक आहे. हा विजय आम्हाला आणखी उत्साह देणार आहे, अशी प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी नवी दिल्लीतील भाजपच्या कार्यालयात व्यक्त केली.
आसाममध्ये पक्षाला मिळालेले घवघवीत यश आणि केरळमध्ये अनेक वर्षांनंतर विधानसभेत जाण्याची मिळालेली संधी याबद्दल त्यांनी सर्व कार्यकर्त्यांचे आणि नेत्यांचे आभार मानले. पक्षाच्या मुख्यालयात जमलेल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधताना ते म्हणाले, भाजपची विकासाची विचारधारा, सामान्य माणसाच्या जीवनात बदल घडवून आणण्याचा प्रयत्न देशातील जनतेने स्वीकारला आहे आणि त्याचे समर्थनही केले आहे. गरिबांच्या उद्धारासाठी आणि सामान्यांच्या जीवनात बदल घडवून आणण्यासाठी हा विजय आम्हाला आणखी उत्साह देणारा आहे. भाजप वेगाने देशाच्या सर्व भूभागांवर जनादेश प्राप्त करत आहे. ही घटना लोकशाहीसाठी अत्यंत उत्तम आहे.