नाशिकमधील झाकीर हुसैन रुग्णालयामध्ये ऑक्सिजनची गळती झाल्याने २२ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. एकीकडे राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा असतानाच दुसरीकडे ऑक्सिजन गळतीमुळे २२ जणांना प्राण गमावावे लागल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. यासंदर्भात देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनीही दु:ख व्यक्त केलं आहे. शाह यांनी ट्विटरवरुन मृतांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही ट्विटरवरुन या घटनेसंदर्भात खेद व्यक्त केलाय.

“नाशिकमधील रुग्णालयामध्ये झालेल्या ऑक्सिजन गळतीची बातमी ऐकून दु:ख झालं आहे. या अपघातामध्ये ज्यांनी आपल्या जवळच्या व्यक्तींना गमावलं आहे त्यांच्या कधीही न भरुन येणाऱ्या नुकसानीसाठी मी सद्भावना व्यक्त करतो. इतर सर्व रुग्णांच्या आरोग्यासाठी मी देवाकडे प्रार्थना करतो,” असं शाह यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

“नाशिकमध्ये टँकरमधून ऑक्सिजन गळती झाल्याने लोकांचा मृत्यू झाल्याचं ऐकून वाईट वाटलं. माझ्या सद्भावना मृतांच्या कुटुंबियांसोबत आहेत,” असं गडकरींनी ट्विटरवरुन म्हटलं आहे.

“नाशिकमधील रुग्णालयात झालेल्या ऑक्सिजन गळतीमुळे काहींना प्राण गमावावे लागल्याचं ऐकून धक्का बसला आहे. या दुर्देवी घटनेत काहींना आपले प्राण गमावावे लागल्याने मला फार दु:ख झालं आहे. या दु:खद प्रसंगी आमच्या सद्भावना मरण पावलेल्यांच्या नातेवाईकांसोबत आहेत,” असं राजनाथ सिंह यांना म्हटलं आहे.

नाशिक महापालिकेच्या झाकीर हुसेन हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन टाकीतून गळती झाली होती. ऑक्सिजन टँकरमधून टाकीत भरला जात असताना ही गळती सुरु झाली. टाकीमधील गळती रोखण्यासाठी तसंच दुरुस्तीसाठी रेस्क्यू पथक घटनास्थळी दाखल झालं होतं. दरम्यान रुग्णालयात व्हेंटिलेटरवर असणाऱ्या २३ पैकी २२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.