आज झालेल्या काँग्रेस पक्षाच्या संसदीय बैठकीत पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी करोना परिस्थिती हाताळण्यावरुन मोदी सरकारला चांगलंच फटकावलं आहे.
देशाच्या प्रमुख राजकीय नेत्यांना जनतेविषयी कसलीही सहानुभूती नसल्याने केंद्र सरकारने जनतेला अपयशी ठरवलं असल्याचंही त्या म्हणाल्या.

देश सध्या मोदी सरकारच्या दुर्लक्षाच्या गर्तेत बुडत चालला आहे. करोनाची ही परिस्थिती हाताळण्यासाठी देशाला आता सक्षम आणि द्रष्ट्या नेतृत्वाची गरज आहे.
विषाणूविरुद्धची ही लढाई आता राजकीय मतभेदांच्या पलीकडे गेली आहे. त्यामुळे देशाला आता एक होऊन लढावं लागेल, असंही त्या यावेळी म्हणाल्या.

काँग्रेस पक्षाची ही बैठक ऑनलाईन पद्धतीने पार पडली. मोदी सरकारने करोना परिस्थितीसंदर्भात एक सर्वपक्षीय बैठक घेण्याचंही सोनिया गांधी यांनी सुचवलं आहे. या साथीच्या रोगाचा सामना करण्यासाठी आणि त्याचं उत्तरदायित्व पार पाडण्यासाठी एक स्थायी समिती गठीत करण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली आहे.

नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीबद्दल बोलताना सोनिया गांधी म्हणाल्या, “काँग्रेस पक्षाची या निवडणुकीतली कामगिरी निराशाजनक होती आणि त्यामुळे सर्वांनी मिळून यातून योग्य तो धडा घ्यायला हवा.”