नव्या कृषी विधेयकांच्या विरोधात विविध शेतकरी संघटनांनी शुक्रवारी ‘भारत बंद’चा नारा दिला आहे. काँग्रेसने गुरुवारी दोन महिन्यांच्या देशव्यापी आंदोलनाची सुरुवात केली. प्रामुख्याने पंजाब, हरियाणा, कर्नाटकमध्ये झालेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला काँग्रेस कार्यकर्त्यांनीही सक्रिय पाठिंबा दिला. भाजपने मात्र काँग्रेस दिशाभूल करत असल्याचा आरोप केला.

विविध शेतकरी संघटनांची अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती, अखिल भारतीय शेतकरी संघटना, भारतीय किसान संघटना, अखिल भारतीय किसान महासंघ या देशव्यापी संघटनांनी भारत बंदची हाक दिली आहे. या आंदोलनात ३०हून अधिक शेतकरी संघटना सहभागी होणार आहेत. याशिवाय, सीटू, हिंद मजदूर सभा, नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस आदी १० कामगार संघटनांनीही पाठिंबा दिला आहे. या संघटनाही बंदमध्ये सहभागी होतील.

संसदेत संमत करण्यात आलेल्या तीन शेतीविधेयकांमुळे हमीभावाबाबत साशंकता निर्माण झाली असून कृषी बाजाराची व्यवस्थाही बंद होण्याचा धोका आहे. केंद्र सरकारची ही धोरणे शेतकरी विरोधी असल्याचा दावा शेतकरी संघटना करत आहेत. काँग्रेससह १५ विरोधी पक्षांनीही या शेती विधेयकांना विरोध केला असून राष्ट्रपतींना या विधेयकांवर स्वाक्षरी न करता ती परत पाठवण्याची विनंती केली आहे.

हमीभावाबद्दल दुष्प्रचार -तोमर   

काँग्रेसमध्ये आता समज असलेले नेते राहिले नाहीत, जे नेतृत्व करतात त्यांना देशात कोणी विचारत नाही. त्यांचे पक्षातही कोणी ऐकत नाही. ते देशाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत असतात, अशी टीका केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र तोमर यांनी राहुल गांधी यांचे नाव न घेता केली.

हमीभाव हा कायद्याचा भाग नाही, तो नेहमीच प्रशासकीय धोरणाचा हिस्सा आहे. काँग्रेसकडे शेती विधेयकावर काही बोलण्यासारखे नसल्याने हमीभावाबद्दल दुष्प्रचार केला जात आहे. खरीप आणि रब्बी हंगामासाठी केंद्राने हमीभाव जाहीर केले आहेत. त्यामुळे हमीभाव रद्द करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे तोमर म्हणाले.

काँग्रेसचे दोन महिने आंदोलन

शेतकऱ्यांच्या हिताविरोधातील केंद्राच्या धोरणांविरोधात काँग्रेसने पुढील दोन महिने जनआंदोलन करण्याचे ठरवले असून मंगळवारी पंजाब-हरियाणात काँग्रेस कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. देशभर पत्रकार परिषदा घेऊन शेतकऱ्यांची बाजू मांडली जाईल. संपूर्ण ऑक्टोबर महिन्यात आंदोलनकर्त्यां शेतकऱ्यांच्या दोन कोटी स्वाक्षऱ्या गोळ्या केल्या जातील व १४ नोव्हेंबर रोजी पं. नेहरूंच्या जयंतीदिनी स्वाक्षरींचे पत्र राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना दिले जाईल. २८ सप्टेंबर रोजी राज्या-राज्यांतील काँग्रेसचे नेते राजभवनावर पदयात्रा काढून राज्यपालांना निवेदन सादर करणार आहेत. महात्मा गांधींच्या जयंतीदिनी २ ऑक्टोबर रोजी किसान दिवस पाळला जाणार असून प्रत्येक जिल्ह्य़ामध्ये निदर्शने केली जातील. १० ऑक्टोबर रोजी राज्या-राज्यांमध्ये शेतकरी परिषदा घेतल्या जातील.

पंजाबमध्ये ‘रेल रोको’

* केंद्राने पारित केलेल्या शेतकी विधेयकांच्या विरोधात पंजाबमधील शेतकऱ्यांनी गुरुवारी तीन दिवसांचे ‘रेल रोको’ आंदोलन सुरू केले. त्यांच्याशी संघर्ष टाळण्यासाठी रेल्वेने अनेक गाडय़ा स्थगित केल्या.

* या आंदोलनामुळे २४ ते २६ सप्टेंबर दरम्यान विशेष गाडय़ांच्या १४ जोडय़ा धावणार नाहीत, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले. प्रवाशांची सुरक्षा लक्षात घेऊन, तसेच रेल्वेच्या मालमत्तेचे नुकसान होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे ते म्हणाले.

* स्थगित करण्यात आलेल्या गाडय़ांमध्ये अमृतसर- मुंबई सेंट्रल गोल्डन टेंपल मेल, हरिद्वार- अमृतसर जनशताब्दी एक्स्प्रेस, नवी दिल्ली- जम्मूतावी, अमृतसर- न्यू जलपैगुडी कर्मभूमी एक्स्प्रेस, नांदेड- अमृतसर सचखंड एक्स्प्रेस आणि अमृतसर- जयनगर शहीद एक्स्प्रेस यांचा समावेश असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. अनेक मालगाडय़ा व पार्सल गाडय़ांच्या वेळाही बदलण्यात आल्या आहेत. करोना महामारीमुळे सध्या नियमित प्रवासी गाडय़ांच्या सेवा स्थगित आहेत.

* ‘रेल रोको’चे आवाहन किसान मजदूर संघर्ष समितीने केले होते आणि नंतर अनेक शेतकरी संघटनांनी त्याला पाठिंबा जाहीर केला. भारतीय किसान युनियनच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी सकाळी बर्नाला व संगरूर येथे रेल्वे रुळांवर ठाण मांडले; तर किसान मजदूर संघर्ष समितीच्या झेंडय़ाखाली शेतकऱ्यांनी अमृतसरमधील देवीदासपूर खेडय़ाजवळ आणि फिरोजपूरमधील बस्ती टंकावाला येथे रुळांवर धरणे देण्याचे ठरवले होते.