भाजपचा राजीनामा देऊन वेगळी चूल मांडणाऱ्या नवज्योतसिंग सिद्धू यांचे अजूनही तळ्यात-मळ्यात चालल्याचे दिसते. त्यांच्या या भूमिकेवरच पंजाबचे उपमुख्यमंत्री सुखबीरसिंग बादल यांनी टीका केली असून नवज्योतसिंग सिद्धू हे मानवी बॉम्ब असून एक दिवस त्याचा स्फोट झाल्याशिवाय राहणार नसल्याचा टोला लगावला आहे.
भाजप नेत्यांनी पंजाबमधील राजकारणापासून दूर राहण्यास सांगितल्याने आपण पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याचे सांगितले होते. माजी हॉकीपटू आणि अकाली दलाचा आमदार परगतसिंग याच्या साथीने त्यांनी ‘आवाज ए पंजाब’ या पक्षाची स्थापना करत आपण पंजाबच्या विकासासाठी कुठलीही तडजोड करणार नसल्याचे राणा भीमदेवी थाटात म्हटले होते. परंतु दिवसागणिक त्यांनी आपली राजकीय भूमिका बदलली कधी आम आदमी पक्षाशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला तर कधी काँग्रेसबरोबर युती करण्याचा प्रयत्न सुरू ठेवला. सिद्धू यांच्या याच भूमिकेचा सुखबीरसिंग बादल यांनी समाचार घेतला. सत्तेसाठी सिद्धूंची धडपड सुरू असल्याचाही आरोप त्यांनी केला.
नवज्योतसिंग सिद्धू आणि अकाली दलात पूर्वीपासूनच राजकीय वितूष्ट आहे. अकाली दलाने नेहमीच सिद्धू यांना विरोध केला आहे. त्यामुळेच गत लोकसभा निवडणुकीत सिद्धू यांना उमेदवारी देण्यात आली नव्हती.
दरम्यान, सिद्धू यांनी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली होती. सिद्धू यांना उपमुख्यमंत्री पदाची ऑफर देण्यात आल्याचे सांगण्यात आले होते. परंतु काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि मुख्यमंत्री पदाचे दावेदार कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा सिद्धू यांना विरोध असल्याचे बोलले जाते.