शेतकरी आणि केंद्र सरकारमध्ये अद्यापही चर्चेच्या माध्यमातून तोडगा निघत नसल्याने आंदोलन चिघळत चाललं आहे. गेल्या २० दिवसांपासून शेतकरी नव्या कृषी विधेयकांविरोधात दिल्लीच्या वेशीवर आंदोलन करत आहेत. दरम्यान केंद्रीय मंत्री नितीन गडकर यांनी शेतकरी आंदोलनात नक्षलवादी चळवळीला समर्थन देणाऱ्या व्यक्तीचा फोटो समोर आल्याचं एनडीटीव्हीशी बोलताना म्हटलं आहे.

शेतकऱ्यांची कृषी विधेयकावरुन दिशाभूल केली जात असल्याच्या आरोपावर नितीन गडकरींना विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “मी सर्व शेतकरी किंवा शेतकरी संघटनांबाबत बोलत नाहीये, पण मला तुम्हाला काहीतरी विचारायचं आहे. आमच्या गडचिरोली जिल्ह्यात एका नक्षलवादी चळवळीला समर्थन करणाऱ्या एका व्यक्तीची चौकशी करण्यात आली होती. न्यायालायनेही त्याला जामीन दिला नव्हता. त्याचा आंदोलनातील फोटो कसा काय समोर आला आहे? शेती आणि शेतकऱ्यांशी त्याचा काय संबंध?”.

आणखी वाचा- शेतकरी आंदोलनावरुन नितीन गडकरींचं मोठं विधान; म्हणाले…

“काही घटक शेतकरी आंदोनलनाचा फायदा घेत त्यांची बदनामी करत आपला अजेंडा पुढे नेत आहेत,” असा आरोप नितीन गडकरी यांनी केला आहे. “भारतविरोधी भाषण देणारी एखादी व्यक्ती, ज्याचा शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे काहीच संबंध नाही त्यांचे फोटो कसे काय समोर येत आहेत? यामुळेच मी काही घटक शेतकरी आंदोलनाच्या माध्यमातून बदनामी करत अंजेडा पुढे नेत असल्याचं म्हटलं. हा शेतकरी किंवा शेतकरी संघटनांचा अजेंडा नाही. शेतकऱ्यांनी यापासून लांबच राहिलं पाहिजे हेच मला सांगायचं आहे,” असं नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे.

आणखी वाचा- मोदी सरकारसाठी आंदोलनकर्ते शेतकरी खलिस्तानी, तर भांडवलदार हे उत्तम मित्र – राहुल गांधी

दरम्यान याआधी एएनआयला दिलेल्या मुलाखतीत बोलताना आमचं सरकार शेतकऱ्यांना कृषी कायदे योग्य आहेत हे पटवून देईल, समजावून सांगेल आणि चर्चेच्या माध्यमातून मार्ग काढला जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. “सध्याच्या घडीला कृषी आणि वाणिज्य मंत्री शेतकऱ्यांसोबत चर्चा करण्यात व्यस्त आहेत. जर मला चर्चा करण्यासाठी सांगितलं तर मी नक्कीच त्यांच्याशी संवाद साधेन,” असं नितीन गडकरी म्हणाले आहेत.

आणखी वाचा- “शेतकरी आंदोलन तुकडे तुकडे गँगने हायजॅक केलंय”

“जर चर्चाच नसेल तर यामुळे गैरसमज आणि वाद निर्माण होऊ शकतात. जर चर्चा असेल तर तोडगा काढता येऊ शकतो आणि संपूर्ण प्रकरणच मिटेल. शेतकऱ्यांना न्याय आणि दिलासा मिळेले. शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने आम्ही काम करत आहोत,” असं नितीन गडकरी यांनी म्हटलं. नवे कृषी कायदे आणून सरकारने शेतकऱ्यांविरोधात काही केलेलं नाही असं सांगताना नितीन गडकरी यांनी सरकार शेतकऱ्यांचं म्हणणं ऐकून घेण्यासाठी तयार असल्याचं सांगितलं आहे.