भाजपाकडून सूडभावनेने शरद पवारांना लक्ष्य केलं जात असल्याची टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या एक महिनाआधी कारवाई करण्यावरुनही त्यांनी सरकारला धारवेर धरलं. राहुल गांधी यांनी शरद पवार यांना फोन करत पाठिंबा दर्शवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार यांची सक्तवसुली संचलनालयाकडून (ईडी)होणाऱ्या चौकशीवरुन सध्या मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी तणावाचं वातावरण आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक गैरव्यवहारप्रकरणी ईडीच्या मुंबईतील कार्यालयात शरद पवार स्वत:च उपस्थित राहणार आहेत. त्यांनी स्वत: आपण ईडी कार्यालयात जाणार असल्याचं जाहीर केलं होतं.

राहुल गांधी यांनी शरद पवारांविरोधात होत असलेल्या कारवाईवरुन टीका करत ट्विट केलं आहे. त्यांनी म्हटलं आहे की, “भाजपाकडून सूडभावनेने लक्ष्य केलेले शरद पवार आणखी एक विरोधी पक्षनेते आहेत. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या एक महिना आधी कारवाई केली जात आहे. सरकारच्या सूडभावनेचा निषेध आहे”.

दरम्यान शरद पवार दुपारी दोनच्या सुमारास ईडीच्या कार्यालयात पोहोचतील. परंतु ‘ईडी’ त्यांना कार्यालयात प्रवेश नाकारण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली. तसंच खबरदारी म्हणून मुंबई पोलिसांनी कुलाबा, कफ परेड, मरीन ड्राइव्ह, आझाद मैदान, डोंगरी, जे. जे. मार्ग, एमआरए मार्ग या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत जमावबंदीचे आदेश दिले आहेत.