लोकसभा निवडणुकीत भाजपाला मोठे यश मिळाले आहे. निकालापूर्वी आणि निकालानंतर विरोधी पक्षांनी ईव्हीएम मशीनवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. आता पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी ईव्हीएम मशीनवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. शनिवारी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक पार पडली. यानंतर पवार यांनी ट्विटरवर पोस्ट टाकत ईव्हीएम मशीनबाबत संशय व्यक्त केला.

ईव्हीएम मशीन आणि त्यांच्या संख्येबाबत माझ्या मनात फार आधीपासून शंका होती. मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड इथे भाजपची सत्ता असताना भाजपाचा पराभव झाला आणि काँग्रेस पार्टी विजयी झाली. पण कदाचित हा पराभव देशाच्या निवडणुका जिंकण्यासाठी तर नाही, अशी शंका माझ्या डोक्यात आली होती, असे शरद पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. तसेच आता तेथील सरकार भाजपा पाडण्याच्या विचारात असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

निवडणूक यंत्रणेबाबत यावेळी निवडणुकीत अधिक विचार करण्यात आला. आपले मत बरोबर गेले अथवा नाही याबाबत सर्वांना शंका वाटत आहे. तसेच अशी शंका यापूर्वी कधी कोणाच्याही मनात निर्माण झाली नव्हती. आजही लोकांच्या मनात ही शंका कायम आहे. देशात सत्ताबदल होणार, असे अनेक अभ्यासक, जाणकार, पत्रकार, राजकीय नेते यांचे मत होते. मात्र झाले उलटेच, लोकसभा निवडणुकांचा निकाल अत्यंत वेगळा लागला, असे म्हणत त्यांनी ईव्हीएमच्या विश्वासार्हतेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.