पश्चिम बंगालमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांअगोदर राजकीय वातावारण चांगलच तापल्याचं दिसत आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला टक्कर देण्यासाठी भाजपा नेत्यांकडून कंबर कसली गेली आहे. राज्यभर विविध रॅलींचे आयोजन केले जात आहे. तर, ममता बॅनर्जी देखील भाजपासह विरोधी पक्षांवर जोरदार निशाणा साधताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर मंगळवारी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी प्रचार रॅली दरम्यान भाजपावर निशाणा साधत म्हटले की, भाजपा असदुद्दीन ओवेसींच्या एमआयएमला बंगालमध्ये आणण्याचे प्रयत्न करत आहे.

“ममता बॅनर्जींच्या या विधानावर ओवेसींनी प्रतिक्रिया दिली आहे. आजपर्यंत असा कुणी जन्माला आलेला नाही की जो पैशांनी ओवेसीला विकत घेऊ शकेल. त्यांचे आरोप निराधार आहेत व त्या अस्वस्थ आहेत. त्यांनी आपल्या घराची(पक्ष)ची काळजी केली पाहिजे, कारण त्यांचे अनेक लोकं भाजपात जात आहेत. त्यांनी बिहारचे मतदार व आमच्यासाठी मतदान करणाऱ्या लोकांचा अपमान केला आहे.”

तर, “अल्पसंख्यांकांच्या मतांचे विभाजन करण्यासाठी त्यांनी (भाजपा) हैदराबादची एक पार्टी(एमआयएम)ला पकडले आहे. भाजपा त्यांना पैसे देते व ते मतांचे विभाजन करण्याचं काम करतात. बिहार निवडणुकीत हे सिद्ध झालं आहे. असं ममता बॅनर्जींनी जलपाईगुडी येथील सभेत म्हटले होते.”

हिंमत असेल तर राष्ट्रगीत बदलून दाखवा, जनता तुम्हाला…; ममता बॅनर्जींचं खुलं आव्हान

राष्ट्रगीत बदलण्यासंदर्भात भाजपा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी एक पत्र लिहिलं होतं. यावरही ममता बॅनर्जी यांनी भाष्य केलं. “जर भाजपानं असं काही करण्याचा प्रयत्न केला तर राज्यातील जनता त्यांना योग्य ते उत्तर देईल. ते आपल्या देशाचा इतिहास बदलू इच्छित आहेत. आपलं राष्ट्रगीत बदलण्याच्या गोष्टी ते करत आहेत,” असंही ममता बॅनर्जी म्हणाल्या होत्या.