मोदी सरकारच्या तीन नवीन कृषी कायद्यांविरूद्ध दिल्लीच्या सीमेवर २०० दिवसांहून अधिक काळ आंदोलन सुरु आहे. शेतकरी नेत्यांनी सरकारला पत्र लिहिले, बऱ्याच सभा घेतल्या, मोठ्या प्रमाणात ट्रॅक्टर रॅली सुद्धा काढल्या. पण कोणताही तोडगा निघाला नाही. दरम्यान, भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत यांनी २६ जून रोजी देशभरातील राजभवनांना घेराव घालण्याची घोषणा केली आहे. त्यांनी ट्वीट करत, नवीन कृषी कायदे शेतकऱ्यांसाठी डेथ वॉरंट असल्याचे म्हटले आहे.

माध्यमांशी बोलताना टिकैत म्हणाले की, आंदोलनाला आता सात महिने झाले आहेत. याबाबत राज्यपालांना निवेदन देण्यात येईल. यापूर्वी टिकैत यांनी दोन ट्वीट केले होते ज्यात त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना हा संदेश दिला की जर पाणी, जंगल आणि जमीन वाचवायची असेल तर दरोडेखोरांविरूद्ध लढा द्यावा लागेल. दुसर्‍या पोस्टमध्ये ते म्हणाले होते की सरकारने तीनही कायदे रद्द करावे आणि एमएसपीवर कायदा करावा.

जाणून घ्या: शेतकरी आंदोलनाचं मूळ असलेलं MSP म्हणजे काय?

भाजपाला मत न देण्याचे आवाहन-

राकेश टिकैत म्हणाले, “उत्तर प्रदेश निवडणुकीत भाजपाला मत देऊ नका. ते म्हणाले की, भाजप सरकार फसवणूक करीत आहे. उसाचे देय मुळीच वाढलेले नाही, हे सरकार शेतकऱ्यांच्या हिताचे बोलत नाही, म्हणून आम्ही त्यांच्यावर बहिष्कार टाकला आहे.”