राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शनिवारी पाच राज्यांत नव्या राज्यपालांची नियुक्ती केली. तर एका केंद्रशासित प्रदेशामध्ये उपराज्यपालांची नियुक्ती करण्यात आली. बिहार, तामिळनाडू, मेघालय, आसाम आणि अरुणाचल प्रदेश या राज्यांतील विद्यमान राज्यपालांना हटवून त्याजागी नव्या राज्यपालांची नियुक्ती करण्यात आली आहे.


सत्यपाल मलिक यांची बिहारच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. प्राध्यापक जगदीश मुखी यांच्याकडे आसामच्या राज्यपालपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. गंगा प्रसाद हे मेघालयचे नवे राज्यापाल असणार आहेत. बी. डी. मिश्रा यांची अरुणाचल प्रदेशच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

बनवारीलाल पुरोहित यांच्याकडे तामिळनाडूच्या राज्यपालपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. यापूर्वी तामिळनाडूचा अतिरिक्त कार्यभार महाराष्ट्राचे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्याकडे सोपवण्यात आला होता. निवृत्त अॅडमिरल देवेंद्रकुमार जोशी यांची केंद्रशासित प्रदेश अंदमान-निकोबारच्या उपराज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे.