बँकांना गंडा घालून परदेशात फरार झालेल्या विजय मल्ल्या, नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांना अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीने मोठा झटका दिला आहे. तिन्ही उद्योगपतींनी सार्वजनिक बँकांचं कर्ज बूडवून परदेशात पोबारा केला आहे. या प्रकरणात ईडीने नीरव मोदी, विजय मल्ल्या आणि मेहुल चौक्सी यांची १८ हजार १७० कोटींची मालमत्ता जप्त केली होती. यापैकी ९ हजार कोटींची संपत्ती ईडीने कर्ज बुडवण्यात आलेल्या सार्वजनिक बँका आणि केंद्र सरकारकडे हस्तांतरित केली आहे.

ईडीने बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी उद्योगपती विजय मल्ल्या, हिरे व्यापारी नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांची १८ हजार १७० कोटींची संपत्ती संपत्ती निवारण अधिनियम २००२ अर्थात पीएमएलए कायद्यातंर्गत १८ हजार कोटींची संपत्ती जप्त केली होती. या संपत्तीपैकी ९ हजार ३७१.१७ कोटींची संपत्ती कर्ज बुडवलेल्या सार्वजनिक बँकांकडे हस्तांतरित करण्यात आली आहे.

हेही वाचा- फसवणूक करणारा म्हणून उल्लेख केल्याने विजय मल्ल्याचा संताप; ट्वीट करत म्हणाला…

ईडीने ट्वीट करून या संपत्ती हस्तांतरण प्रक्रियेबद्दल माहिती दिली आहे. “ईडीने फक्त संपत्ती निवारण अधिनियम २००२ अर्थात पीएमएलए कायद्यातंर्गत विजय मल्ल्या, नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांच्या प्रकरणात १८,१७०.०२ कोटी (बँकांच्या एकूण नुकसानीपैकी ८०.४५ टक्के रक्कम) रुपयांची संपत्ती जप्त केली आहे. यापैकी ९३७१.१७ कोटी रुपये मूल्यधारणा असलेली संपत्ती सरकारी बँका आणि केंद्र सरकारकडे हस्तांतरित केली आहे,” अशी माहिती ईडीने दिली आहे.

मेहुल चोक्सी आणि नीरव मोदी यांनी काही बँक अधिकाऱ्यांना हाताशी धरून पंजाब नॅशनल बॅंकत १३,५०० कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप आहे. नीरव मोदी सध्या लंडनमधील एका तुरूंगात असून, मेहुल चोक्सी डोमिनिकातील तुरूंगात आहे. दोघांविरुद्धही सीबीआय चौकशी करत असून, त्यांना भारतात आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. दुसरीकडे ९००० कोटींची घोटाळा आणि बेहिशोबी मालमत्ता जमविल्याच्या प्रकरणात विजय मल्ल्याची चौकशी सुरू आहे. यात किंगफिशर एअरलाईन्सचा समावेश आहे.