मुकेश अंबानी यांच्या मालकीच्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) कंपनीची 43 वी वार्षिक सर्वसाधारण सभा (Annual General Meeting) बुधवारी झाली. हक्कभाग आणि हिस्सा विक्रीतून विक्रमी गुंतवणूक खेचत सहामाहीतच कर्जमुक्त होणाऱ्या रिलायन्स समूहाने नव्या वर्षांपासून 5जी दूरसंचार सेवा सुरू करत असल्याची घोषणा केली. यावेळी रिलायन्स फाऊंडेशनच्या चेअरपर्सन निता अंबानी यांनी पहिल्यांदाच या सभेला संबोधित केलं.

वार्षिक सर्वसाधारण सभेला पहिल्यांदाच संबोधित करताना निता अंबानी यांनी, करोनाचं व्हॅक्सिन उपलब्ध होताच ते देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात पोहोचवण्यासाठी रिलायन्स काम करणार असल्याचं सांगितलं. “करोनाविरोधातील लढाई अजून बाकी आहे. जिओच्या डिजिटल पायाभूत सुविधांच्या मदतीने, संपूर्ण देशभरात मेगा-स्केल कोविड टेस्टिंगसाठी सरकार आणि स्थानिक नगरपालिकांशी भागीदारी करणार आहे. देशभरात जास्तीत जास्त कोविड चाचण्या करता याव्यात यासाठी जिओच्या डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चरची मदत घेतली जाईल आणि मी तुम्हाला आश्वासन देते की जसं करोनाचं व्हॅक्सिन उपलब्ध होईल ते डिजिटल डिस्ट्रिब्यूशन आणि सप्लाय चेनद्वारे (डिजिटल वितरण आणि पुरवठा साखळीचा वापर करून) देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात पोहोचेल हे आम्ही सुनिश्चित करू”, असं त्या म्हणाल्या.


“करोना महामारीच्या काळात, फक्त दोन आठवड्यांमध्ये आम्ही मुंबईत देशातील पहिलं १०० बेड असलेलं स्पेशल कोविड 19 हॉस्पिटल उभं केलं. आता त्या हॉस्पिटलची क्षमता २०० बेड झाली आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी दररोज १ लाखांहून अधिक पीपीई किट्स आणि N95 मास्कचं उत्पादन घेत आहोत. याशिवाय करोना रुग्णाला तातडीने मदत मिळावी यासाठी रिलायन्स अत्यावश्यक सेवेतील वाहनांना मोफत इंधन पुरवत आहे”, असंही निता अंबानी यांनी यावेळी सांगितलं.