प्रजासत्ताक दिनी राजपथावर नितीन गडकरी आणि राहुल गांधी यांच्यात रंगलेल्या गप्पा हा चर्चेचा विषय ठरला होता. या दोन नेत्यांमध्ये काय चर्चा झाली, याची उत्सुकता सर्वांनाच होती. अखेर गडकरींनी राहुल गांधींसोबत काय चर्चा केली हे उघड केले आहे. 'राहुल गांधींसोबत सर्वसाधारण चर्चा झाली. रॅली आणि प्रजासत्ताक दिन यासंदर्भात आमच्यात गप्पा रंगल्या', असे गडकरींनी सांगितले. राहुल गांधी यांच्याशी गप्पा मारण्यात गैर काय?, असा प्रतिप्रश्नही त्यांनी केला आहे. प्रजासत्ताक दिनी राजपथावर राहुल गांधी हे नितीन गडकरींच्या शेजारी बसले होते आणि दोन्ही नेत्यांमध्ये काही काळ गप्पा देखील रंगल्या होत्या. याचे व्हिडिओ देखील समोर आले होते. नितीन गडकरी यांनी भाजपाच्या पक्षनेतृत्वाविरोधात सूचक विधान केले असतानाच या गप्पा रंगल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले. अखेर नितीन गडकरी यांनी एबीपी हिंदी या वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात गुपित उघड केले आहे. ते म्हणाले, मी ठरवून मैत्री करत नाही. राजकारणात मतभेद असू शकतात, पण मनभेद नसावे. राजकारणाचा एक स्तर आपण जपला पाहिजे. राहुल गांधी यांच्या चौकीदार चोर है या विधानावरही गडकरींनी आक्षेप घेतला. देशाच्या पंतप्रधानांना उद्देशून चोर हा शब्द वापरणे योग्य वाटते का?, शेवटी यावरुन प्रतिक्रिया उमटणारच, असे त्यांनी सांगितले. राम मंदिराच्या मुद्द्यावर गडकरी म्हणाले, राम मंदिर हा राजकीय मुद्दा होऊ शकत नाही. तो आस्थेचा विषय आहे. कोट्यवधी लोकांच्या भावना राम मंदिराशी जोडल्या गेलेल्या आहेत. सुप्रीम कोर्टाने आता यावर निर्णय दिला पाहिजे मगच पुढील कामाला सुरुवात होईल, असे त्यांनी नमूद केले. मी जवाहरलाल नेहरु यांचा आदर करतो, आर्थिक मुद्द्यांवर माझे मतभेद असू शकतात, पण नेहरुंच्या चांगल्या गोष्टींचे आपण अनुकरण केले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.