बिहारमध्ये पुन्हा एकदा भाजपाप्रणीत एनडीएची सत्ता आली आहे. जनता दल युनायटेड आणि भाजपा आघाडीला बिहारच्या जनतेने चौथ्यांदा सत्तेचा कौल दिला. काल नव्या सरकारचा शपथविधी पार पडला. नितीश कुमार यांनी सातव्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. बिहारमध्ये मात्र एक गोष्ट बदलली आहे. आता भाजपा बिहारमध्ये मोठया भावाच्या भूमिकेत असणार आहे. यापूर्वी जेडीयूचा वरचष्मा होता.

काल नव्या सरकारचा शपथविधी झाल्यानंतर आज खातेवाटप जाहीर झाले आहे. बिहारमध्ये गृह खाते कोणाकडे जाणार? याबद्दल उत्सुक्ता होती. कारण भाजपाचे संख्याबळ जास्त असल्याने गृहखाते भाजपाच्या मंत्र्याकडे जाणार की, नितीश कुमार हे खाते आपल्याकडेच ठेवणार? याबद्दल विविध तर्क-विर्तक लढवले जात होते. पण सरकारमध्ये भाजपाचे संख्याबळ जास्त असूनही नितीश कुमार गृहखाते आपल्याकडे ठेवण्यात यशस्वी ठरले आहेत.

भाजपा नेते आणि उपमुख्यमंत्री तारकिशोर प्रसाद यांना महत्त्वाचे अर्थ खाते मिळाले आहे. त्याशिवाय पर्यावरण, वन, माहिती-तंत्रज्ञान या खात्यांचा कार्यभार सुद्धा त्यांच्याकडेच असेल. मंत्रिमंडळाचा विस्तार होईपर्यंत सामान्य प्रशासन आणि अन्य महत्त्वाची खाती नितीश कुमार यांच्याकडेच असतील. नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारमध्ये १४ मंत्र्यांचा शपथविधी झाला. भाजपाकडून सात, जेडीयूकडून पाच तसेच एचएएम आणि व्हीआयपीकडून प्रत्येकी एकाने मंत्रिपदाची शपथ घेतली. भाजपा आमदार आणि दुसऱ्या उपमुख्यमंत्री रेणू देवी यांना पंचायत राज मंत्रालय देण्यात आले आहे. बिहारमध्ये नितीश कुमार यांना मुख्यमंत्रिपद देतानाच भाजपाने दोन उपमुख्यमंत्रीपद आपल्याकडे ठेवली आहेत.