देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी चीनबरोबरच्या वादासंदर्भात एक महत्वपूर्ण विधान केलं आहे. त्यांनी म्हटलं आहे की, चीनबरोबर लडाखमध्ये सुरू असलेल्या वादावर अद्याप काही ठोस निष्कर्ष निघालेला नाही. त्यामुळे आहे तशीच परिस्थिती त्या ठिकाणी कायम आहे.

यावेळी राजनाथ सिंह यांनी सांगितले की, चीनबरोबर चर्चा सुरू आहे. लवकरच आणखी एक सैन्यस्तरीय चर्चा होणार आहे. आतापर्यंत ज्या चर्चा पार पडल्या, त्यातून काहीच तोडगा निघालेला नाही. आता आहे तीच परिस्थिती कायम आहे, मात्र ती फारशी चांगली नाही. जर एखादा देश विस्तारवादाचे धोरण अवलंबवत असेल, तर भारताकडेही एवढी क्षमता आहे की, आपल्या जमिनीवर घुसण्यापासून त्या देशाला रोखू शकेल.

तसेच, भारत-चीनमध्ये प्रदीर्घ काळापासून सीमावाद सुरू आहे. चांगलं झालं असत हे वाद अगोदरच संपले असते. जर हे वाद संपुष्टात आले असते, तर आजची परिस्थिती उद्भवली नसती. चीन सीमेवर सातत्याने आपल्याबाजूने पायाभूत सुविधा तयार करत आहे. मात्र भारत देखील आपले सैन्य आणि नागरिकांसाठी काम करत आहे. आम्ही कुणावर आक्रमण करण्यासाठी नाही तर आपल्या सुविधांसाठी असं करत आहोत. असं राजनाथ सिंह यांनी यावेळी सांगितलं.

चीनकडून क्षेपणास्त्र तैनात; पण भारतही सज्ज

पूर्व लडाख क्षेत्रात चीनच्या हवाई दलाने क्षेपणास्त्रे आणि रडार यंत्रणा मोठय़ा प्रमाणावर तैनात केली आहे, मात्र भारताने कोणत्याही स्थितीचा मुकाबला करण्यासाठी आवश्यक ती पावले उचलली आहेत, असे हवाई दलप्रमुख आरकेएस भदौरिया यांनी स्पष्ट केले आहे.