दहशतवादाविरुद्ध संरक्षण दलाने उघडलेल्या मोहिमेनंतर दहशतवादी संघटनांमध्ये स्थानिक काश्मिरी तरुणांचे भरती होण्याचे प्रमाण कमी झाले आहे असे भारतीय लष्कराने बुधवारी सांगितले. दहशतवादी संघटनांमध्ये स्थानिक तरुणांचे भरती होण्याचे प्रमाण कमी झाले आहे. हे चांगले लक्षण आहे असे जम्मू-काश्मीरचे पोलीस महासंचालक दीलबाग सिंह यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत सांगितले. लष्कर आणि पोलिसांची संयुक्त पत्रकार परिषद झाली.

२०१८ मध्ये एकूण २७२ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आणि मोठया प्रमाणात दहशतवाद्यांना अटक करण्यात आली. या वर्षात आतापर्यंत ६९ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला असून १२ दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. पुलवामानंतर ४१ दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. त्यातले २५ जैश-ए-मोहम्मदमध्ये सक्रीय होते. यात १३ दहशतवादी पाकिस्तानी होते अशी माहिती जीओसी १५ कॉर्पचे केजेएस धिल्लॉन यांनी दिली.

दहशतवाद्यांविरुद्ध कारवाई अशीच सुरु राहिल त्यांना डोकं वर काढू देणार नाही असे धिल्लॉन यांनी सांगितले. काश्मीरमध्ये आम्ही जैश-ए-मोहम्मदच्या नेतृत्वाला लक्ष्य केले. त्यामुळे परिस्थिथी आता अशी आहे की, खोऱ्यात कोणीही जैशचे नेतृत्व करण्यासाठी पुढे येण्यास तयार नाही असे धिल्लॉन यांनी सांगितले.