भारताबरोबर आता चर्चा करण्याची आपली इच्छा राहिलेली नाही असे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी म्हटले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबरोबर फोनवरुन झालेल्या चर्चेनंतर इम्रान खान यांनी द न्यूयॉर्क टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत जम्मू-काश्मीर आणि भारत-पाकिस्तान संबंधांबाबत भाष्य केले.

मी वारंवार चर्चेचा प्रस्ताव दिला पण पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नेहमीच तो धुडकावून लावला. आता भारताबरोबर चर्चा करण्यात काहीही अर्थ नाही असे इम्रान या मुलाखतीत म्हणाले. दोन अण्वस्त्र संपन्न देशांमध्ये वाढत असलेल्या तणावाबद्दलही इम्रान यांनी चिंता व्यक्त केली. इम्रान यांनी पुन्हा युद्धाचा राग दिला. दोन अण्वस्त्र संपन्न देश समोरासमोर असतील तेव्हा काही होऊ शकते असे इम्रान म्हणाले.

जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० हटवण्याच्या भारताच्या निर्णयाविरोधात पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय कोर्टात जाणार आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत चीनच्या मागणीवरुन बंदद्वार चर्चा देखील झाली. पण त्यासंबंधी कुठलीही अधिकृत भूमिका संयुक्त राष्ट्राकडून समोर आली नाही. संयुक्त राष्ट्रासह जगातल्या अनेक देशांनी काश्मीर हा आंतरराष्ट्रीय नव्हे तर भारत-पाकिस्तानमधला द्विपक्षीय मुद्दा असल्याचे स्पष्ट केले आहे. तरीही पाकिस्तान काश्मीरवरुन आगपाखड करत आहे.