बिहार विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटपावरून भाजपच्या नेतृत्त्वाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये सर्वकाही आलबेल नाही, हे मंगळवारी पुन्हा एकदा स्पष्ट झाले. लोक जनशक्ती पक्षाचे नेते चिराग पासवान यांनीच पत्रकार परिषदेत सर्वकाही आलबेल नसल्याची कबुली दिली. मात्र, आमच्या आक्षेपांवर विचार करून योग्य निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी आम्हाला दिले आहे. त्यामुळेच आम्ही सध्या शांत आहोत, असे चिराग पासवान यांनी सांगितले.
बिहार निवडणुकीसाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील जागावाटप अमित शहा यांनी सोमवारी जाहीर केले. सर्व घटक पक्षांना विचारात घेऊन एकमताने जागावाटप निश्चित करण्यात आले असल्याचे अमित शहा यांनी यावेळी सांगितले. मात्र, त्याच्या दुसऱयाच दिवशी चिराग पासवान यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली.
रालोआतील जागा वाटपावरून लोक जनशक्ती पक्षाचे सर्वेसर्वा आणि केंद्रीय मंत्री रामविलास पासवान नाराज आहेत, हे सोमवारी दिसून आले होते. त्या पार्श्वभूमीवर चिराग पासवान म्हणाले, कुठेतरी आग लागल्याशिवाय धूर दिसत नाही. जागावाटपावरून आम्ही चिडलेलो नाही. मात्र, आम्हाला धक्का नक्कीच बसला आहे. आमच्याशी चर्चा केली गेली त्यावेळी जागावाटपाचा वेगळाच फॉर्म्युला निश्चित करण्यात आला होता. प्रत्यक्षात वेगळाच जाहीर करण्यात आला, असे त्यांनी सांगितले. आम्ही आमचे आक्षेप भाजप अध्यक्षांपर्यंत पोहोचविले आहेत. आता त्यांच्याकडून काय प्रतिसाद येतो, याची आम्ही वाट पाहात आहोत, असे त्यांनी म्हटले आहे.