नितीन गडकरी यांचे नाव पंतप्रधानपदासाठी चर्चेत आले असतानाच यावर गडकरींनी अखेर स्पष्टीकरण दिले आहे. मला कुवतीपेक्षा जास्त मिळाले असून मी पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नाही, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे. नेहरुंच्या चांगल्या कामांचेही आपण अनुकरण केले पाहिजे, असेही त्यांनी म्हटल आहे.

तीन राज्यांमध्ये भाजपाचा पराभव झाल्यानंतर अमित शाह आणि नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर प्रश्न उपस्थित झाले. तीन राज्यांमधील पराभवाच्या दुसऱ्याच दिवशी सोशल मीडियावर नितीन गडकरी हेच पंतप्रधानपदासाठी योग्य उमेदवार आहेत, अशा आशयाचे मेसेज व्हायरल झाले होते. नितीन गडकरी यांनी देखील ‘नेतृत्वाने पराभवाचीही जबाबदारी स्वीकारावी’, असे सूचक विधान केल्याने चर्चेत भर पडली.

अखेर नितीन गडकरी यांनी या चर्चेवर प्रतिक्रिया दिली आहे. एबीपी हिंदी या वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात त्यांनी भाष्य केले. माझ्या विधानांचा चुकीचा अर्थ काढला. मी जे विधानच केले नाही, ते माझ्या नावावर चालवण्यात आले. मी कोणत्याही स्पर्धेत नाही. मी माझ्या मनानुसार आयुष्य जगतो. मी कोणाच्या इशाऱ्यावर भाष्य करत नाही, असे त्यांनी सांगितले.

२०१४ च्या तुलनेत आगामी निवडणुकीत भाजपाप्रणित ‘एनडीए’ला जास्त जागा मिळतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. आम्ही जे लक्ष्य ठेवून आलो होतो, ते गाठण्याच्या दिशेने सरकारचे काम सुरु आहे. जनता पुन्हा मोदी सरकारवर विश्वास टाकेल आणि पुन्हा देशात भाजपा सरकार येईल, असे त्यांनी सांगितले. नरेंद्र मोदी हेच आगामी पंतप्रधान असतील, असा पुनरुच्चार त्यांनी केला.