कोलकात्याचे पोलीस आयुक्त राजीव कुमार यांना अटक करु नये, असा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला हा आमचाच नव्हे तर जनतेचा विजय आहे. आपण सहकार्य करणार नसल्याचं राजीव कुमार यांनी सीबीआयला कधीही म्हटलं नव्हतं. तर यासंदर्भात पाच पत्रे त्यांनी सीबीआला लिहीली आहेत, त्यामुळे ही केस आमच्याच बाजूने आहे, असा दावा करताना मोदी बिग बॉस नव्हेत तर लोकशाही व्यवस्था देशाची बिग बॉस आहे, अशा शब्दांत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधानांवर कठोर शब्दांत टीका केली.

ममता बॅनर्जी सध्या सीबीआयच्या कारवाईविरोधात धरणे आंदोलनाला बसल्या आहेत. दरम्यान, त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, केंद्र सरकार आणि राज्य सरकार या दोघांनी एकमेकांचा आदर राखायला हवा. केंद्राचे आणि राज्याचे स्वतंत्र कायदे कानून असून यामध्ये एकमेकांची ढवळाढवळ व्हायला नको. अशा प्रकारे जर संविधान मोडण्याचं काम केलं तर देशात कोणतंही राज्य चालू शकणार नाही.

कोलकात्याच्या पोलीस आयुक्तांना जर सीबीआयने ऑफिसमध्ये येऊन चौकशी करायची आहे असं सांगितलं असतं आणि आपण आता कार्यालयात नाही तुम्ही घरी या असं जर राजीव कुमार म्हणाले असते त्यानंतर सीबीआयचे अधिकारी त्यांच्या घरी गेले असते तर ठीक होतं. मात्र, अचानक एखाद्याच्या घरी जाऊन विना वॉरंट तुम्ही कट रचला असे सांगत त्याच्यावर अटकेची कारवाई करणार असाल तर ते योग्य नाही. राजीव कुमार यांनी कधीही सीबीआयला सांगितले नव्हते की ते उपलब्ध नाहीत, उलट त्यांनी यासंदर्भात सीबीआयला पाच पत्रे लिहीली आहेत. त्यामुळे ही केस आमच्या बाजूने आहे, कोर्टानेही राजीव कुमार यांना तपासाला सहकार्य करण्यास सांगितले आहे, उलट अटकेची कारवाई नको असे आदेश दिले आहेत. हा केवळ आमचाच नव्हे तर संविधानचा विजय आहे. त्यामुळे मोदी हे बिग बॉस नाहीत तर इथली लोकशाहीच या देशाची बिग बॉस आहे, अशा शब्दांत ममतांनी पोलीस आयुक्त राजीव कुमार यांची पाठराखण करीत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला.

ममता म्हणाल्या, आम्ही एकटे नाही अनेक जण आमच्यासोबत आहेत. विविध राजकीय पक्षांसह सामाजिक संस्थांनाही आम्हाला पाठींबा दिला आहे. आमचे हे आंदोलन केवळ तृणमुलचे नाही तर जनआंदोलन आहे. आज आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री इकडे येत आहेत, आम्हाला पाठींबा दिलेल्या इतर नेत्यांना तसेच ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्याशी चर्चा करुन हे धरणे आंदोलन स्थगित करावे की नाही हे आम्ही ठरवू. मोदी सरकार केंद्रीय संस्थांचा गैरवापर करुन लोकांमध्ये फूट पाडण्याचे काम करीत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

देशात सध्या हुकुमशाहीचे वातावरण आहे. मोदी सरकार आम्हाला निधी देत नाही, काम करु देत नाही, आमच्या लोकांना, बॉलिवूडला इथल्या लोकांना त्रास देतंय, कधीपर्यंत हे सहन करणार. मोदींविरोधात काहीही बोलू नका असे अनेक फोनही आमच्या सारख्या राजकीय लोकांना येत आहेत. मात्र, आता आम्ही शांत राहणार नाही ही हुकूमशाही मोडीत काढणार असून २०१९ मध्ये मोदी पुन्हा निवडून येणार नाहीत, असेही त्यांनी यावेळी ठामपणे सांगितले.