भारतात राहणारा प्रत्येक व्यक्ती मग तो कोणत्याही जाती-धर्माचा असू दे, तो राष्ट्रवादीच आहे, असे आम्ही मानतो. समाजातील सौहार्दपूर्ण संबंधाचा मुद्दा कोणीही राजकीय लाभासाठी वापरू नये, असेही केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी विरोधकांना ठणकावले. राम शंकर कथेरिया यांनी केलेले भाषण मी स्वतः ऐकले असून, त्यामध्ये भावना भडकावणारे काहीही नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
राज्यसभेमध्ये विरोधकांनी रामशंकर कथेरिया यांच्या भाषणाचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलामनबी आझाद यांनी दोन समाजांमध्ये तेढ निर्माण होईल, असे वक्तव्य करणाऱ्या भाजप खासदारांवर देशद्रोहाचा गुन्हा का दाखल करण्यात येऊ नये, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
कथेरिया यांनी आग्रामध्ये विश्व हिंदू परिषदेच्या कार्यक्रमात केलेले भाषण वादग्रस्त ठरले आहे. त्यावर विरोधकांनी संसदेच्या दोन्ही सभागृहात आक्षेप घेतला. आग्रामध्ये जे काही घडले, ती स्वतंत्र घटना म्हणून पाहाता येणार नाही. भारतमातेचा अपमान करण्यात आला आहे. आणि केंद्रीय गृहमंत्र्यांनी या संदर्भात आपली प्रतिक्रिया दिलीच पाहिजे, असे कम्युनिस्ट पक्षाचे नेते डी. राजा यांनी सांगितले. त्यावर राजनाथ सिंह यांनी सभागृहात उत्तर दिले आणि त्यांनी विरोधकांचे सर्व आरोप फेटाळून लावले.
कथेरिया यांच्या वक्तव्यावरून काँग्रेसच्या सदस्यांनी गुरुवारी संसदेच्या आवारात निदर्शनेही केली.