बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालात काय चित्र स्पष्ट होणार हे अद्याप समजू शकलेलं नाही. आता जे कल हाती येत आहेत त्यावरुन महाआघाडी आणि एनडीए यांच्यात चुरशीची लढाई दिसून येते आहे. कारण आता भाजपाप्रणित एनडीएने १२१ जागांवर आघाडी घेतली आहे. तर महाआघाडीने ११६ जागांवर आघाडी घेतली आहे. एकूण २४३ जागांपैकी ३१ जागांचे निकाल लागले आहेत. यामध्ये १० जागांवर भाजपा, राजद ८ जागांवर तर जदयू ६ जागांवर विजयी झाली आहे. काँग्रेस आणि विसनशील इन्सान पार्टी यांना प्रत्येकी २ जागा तर एमआयएम, सीपीआय आणि सीपीएम यांना प्रत्येकी एक जागा मिळाली आहे.

बिहारची निवडणूक एनडीए आणि महाआघाडी या दोहोंनी प्रतिष्ठेची केली आहे. सकाळी मतमोजणीला सुरुवात झाली तेव्हा जे कल हाती आले त्यात महाआघाडीने आघाडी घेतली. त्यानंतर एनडीएने आघाडी घेतली. दोहोंमध्ये टफ फाइट पाहण्यास मिळते आहे. काही वेळापूर्वीच जे कल हाती आले आहेत त्यामध्ये ११६ जागांवर महाआघाडीने आघाडी घेतली आहे. तर १२१ जागांवर एनडीएने आघाडी घेतली आहे. करोनाच्या काळात मतमोजणी सुरु असल्याने मतमोजणीला विलंब लागतो आहे. सगळं चित्र स्पष्ट होण्यास रात्री उशीर लागू शकतो असंही स्पष्ट करण्यात आलं आहे.