देशातील सर्वात मोठी जीवन विमा कंपनी ‘लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन’ म्हणजेच ‘एलआयसी’च्या ग्राहकांसाठी चांगलं वृत्त आहे. एलआयसीने दोन वर्षांपासून पॉलिसी बंद असणाऱ्या ग्राहकांना ती पुन्हा चालू करण्याची संधी उपलब्ध करुन दिली आहे. तसेच ज्या ग्राहकांच्या पॉलिसीचे नूतनीकरण रखडले आहे त्यांना ती पुन्हा चालू करता येणार आहे. भारतीय आयुर्विमा महामंडळाने दोन वर्षांपेक्षा अधिक कालावधीत हप्ता न भरलेल्या विमाधारकांना विमा योजनेचे (पॉलिसी) पुनरुज्जीवन करण्याची अनुमती दिली आहे. यामुळे महामंडळाने विकलेल्या एकूण योजनेचा विमा हप्ता भरणे सुरू असलेल्या योजनेच्या गुणोत्तरात सुधारणा होण्यास मदत होणार आहे.

दोन वर्षांपेक्षा अधिक कालावधीत हप्ता थकल्यास योजनेचे नूतनीकरण शक्य नव्हते. सुधारित आदेशामुळे आता दोन वर्षांहून अधिक काळासाठी हप्ता थकूनही योजनेचे नूतनीकरण शक्य होणार आहे, असे महामंडळाच्या निवेदनात म्हटले आहे. यापूर्वीच्या नियमांनुसार कुणीही पॉलिसीधारक सलग दोन वर्षे प्रीमियम भरत नसेल तर, त्याची पॉलिसी बंद करण्यात येते. एकदा बंद झालेल्या पॉलिसीचे नूतनीकरण करण्याचा कोणताही मार्ग उपलब्ध नव्हता.

महामंडळाने विमा नियामक मंडळाकडे केलेल्या विनंतीला अनुसरून १ जानेवारी २०१४ नंतर विकलेल्या कंपनीचा विमा हप्ता थकीत झाल्यामुळे निलंबित केलेल्या युनिट लिंक्ड योजना ३ वर्षांच्या आत आणि हप्ता थकीत झाल्यामुळे निलंबित केलेल्या नॉन-लिंक्ड योजना ५ वर्षांच्या आत पुनर्जीवित करणे शक्य होणार आहे. १ जानेवारी २०१४ नंतर महामंडळाने विकलेल्या आणि दोन वर्षांपेक्षा अधिक कालावधीसाठी हप्ता थकल्यामुळे निलंबित अवस्थेत गेलेल्या योजनांचे आता पुनरुज्जीवन शक्य झाले आहे.

भारतीय आयुर्विमा महामंडळाचे (एलआयसी) व्यवस्थापकीय संचालक विपिन आनंद यांनी सांगितले की, दुर्दैवाने आर्थिक अडचणींमुळे जेव्हा एखादी व्यक्ती विमा हप्ता भरणे सुरू ठेवण्यास असमर्थ असते तेव्हा योजना निलंबित होते आणि विमाछत्र संपुष्टात येते. विमा छत्राचा लाभ पुन्हा सुरू करण्यासाठी नवीन विमा योजना खरेदी करण्याऐवजी जुन्या योजनेचे पुनरुज्जीवन करणे नेहमीच चांगले असते. जीवन विमा खरेदी करणे ही एखाद्या व्यक्तीने जीवनात घेतलेला एक अत्यंत विवेकी निर्णय असतो आम्ही आमच्या विमाधारकांच्या हिताला कायम महत्त्व देत आलो आहोत. काही अपरिहार्य कारणांनी विमाछत्राचा लाभ गमावलेल्या आमच्या विमाधारकांना त्यांचे आयुर्विमा संरक्षण पुनस्र्थापित करणे शक्य होणार आहे.

कंपनीच्या विमाधारकाची योजना यापूर्वी पुनरुज्जीवीत करणे शक्य नव्हते अशा योजना पुनरुज्जीवित करण्याची आणि विमाछत्राद्वारे आर्थिक सुरक्षा सुनिश्चित करण्याची अनोखी संधी आहे, असे ते म्हणाले.

दर वर्षांच्या शेवटी सुरू असलेल्या विमाधारकांचा नूतनीकरण हप्ता भरलेल्या धारकांची संख्येशी धारकांची टक्केवारी निश्चित करून विमा योजनेची स्थिरता प्रमाण जीवन विमा कंपन्यांद्वारे व्यापकपणे मोजले जाते. यामुळे विमाधारकांच्या स्थिरता प्रमाणात वाढ होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

अटल पेन्शन योजनेतील सदस्य संख्यी १.९० कोटीवर –

असंघटित क्षेत्रातील कामगारांना वार्षिकीचा लाभ घेण्यासाठी असलेल्या सरकारी प्रमुख निवृत्ती योजनांपैकीना अटल निवृत्ती योजनेतील सदस्य संख्येने १.९० कोटीचा आकडा पार करतअसल्याची माहिती निवृत्ती निधी नियामक आणि विकास प्राधिकरणाने दिली. राष्ट्रीयकृत बँकांना अटल निवृत्ती योजनेची नवीन खाती उघडण्यासाठी देण्यात आलेल्या उद्दिष्टांची पूर्तता हे वाढीमागील मुख्य कारण असल्याचे एका निवेदनात म्हटले आहे. या आर्थिक वर्षांत अटल निवृत्ती योजनेसाठी केलेल्या नोंदणीला प्रतिसाद लाभला. ३१ ऑक्टोबर २०१९ पर्यंत ३६ लाखाहून अधिक खाती उघडली गेली. मागील वर्षांच्या याच कालावधीतील २२ टक्के तुलनेत यंदाची वाढ ३३ टक्के आहे, असे निवृत्ती निधी नियामक आणि विकास प्राधिकरणाने प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.