सुप्रीम कोर्टाने राफेल करारावरुन मोदी सरकारला दिलासा दिल्यानंतर आज (शुक्रवार) संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये मोठा गदारोळ झाला. राफेल प्रकरणी आरोप करणाऱ्या राहुल गांधींनी माफी मागावी, अशी मागणी भाजपा खासदारांनी लोकसभेत केली. विरोधकांनी मोठा गोंधळ घातल्याने राज्यसभेचे कमकाज दिवसभरासाठी तर लोकसभेचे कामकाज सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आले.

फ्रान्सकडून ३६ राफेल जेट विमाने खरेदी करण्याच्या करारात कोणताही गैरव्यवहार आढळलेला नाही, असे स्पष्ट करत सुप्रीम कोर्टाने मोदी सरकारला दिलासा दिला आहे. या करारातील ऑफसेट हक्क रिलायन्स डिफेन्सला देण्याच्या निर्णयातही आक्षेपार्ह काहीच सापडले नसल्याचे कोर्टाने स्पष्ट केले.

अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सुरुवातीला राज्यसभेत राफेल प्रकरणी सरकार चर्चेसाठी तयार असल्याचे सांगितले. काँग्रेस पक्षाने यावर चर्चेला तयार व्हावे असे ते म्हणाले. तर दुसरीकडे काँग्रेसने संयुक्त संसदीय समितीकडून राफेल प्रकरणाच्या चौकशीची जोरदार मागणी केली. तसेच जीपीसी चौकशीची मागणी कायम राहिल असेही काँग्रेसने म्हटले आहे.

तर दुसरीकडे लोकसभेत गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली. काँग्रेस पक्ष हा भ्रष्टाचारी असून आपण तर बुडतच आहोत तुम्हालाही घेऊन बुडू अशी भुमिका घेत त्यांनी मोदी सरकारवर भ्रष्टाचाराचे खोटे आरोप केले असे ते म्हणाले. तसेच काँग्रेसकडून जे खोटं पसरवलं जात होतं, त्याविरोधात कोर्टाने दिलेला निकाल असल्याचे प्रकाश जावडेकर यांनी म्हटले आहे.

दरम्यान, काँग्रेसने सभागृहात राफेल डील, रिझर्व्ह बँक वाद आणि नोटाबंदीविरोध स्थगन प्रस्ताव दाखल केला.