प्रजासत्ताक दिनी काल(मंगळवार) राजधानी दिल्लीत शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर मोर्चात घडलेल्या हिंसाचाराने, शेतकरी आंदोलनास गालबोट तर लागलचं, शिवाय लाल किल्ल्यावरील घुमटांवर आंदोलकांनी अन्य झेंडे फडकवल्याचे पाहून सर्वांनाच धक्का बसला. या हिंसाचारात आंदोलकांकडून सार्वजनिक मालमत्तेच्या नुकसानीसह लाल किल्ल्यातही तोडफोड केली गेली. तर, तब्बल ३०० पेक्षा अधिक पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. यातील अनेकांची प्रकृती गंभीर आहे. पोलिसांनी या हिंसाचाराबद्दल २२ गुन्हे नोंदवले आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज देखील ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे.

राहुल गांधी यांनी आज केलेल्या ट्विटमध्ये महात्मा गांधी यांचा “विनम्रतेने तुम्ही जग हलवू शकता”, हा सुविचार सांगितला आहे. तसेच, “पुन्हा एकदा मोदी सरकारला आवाहन आहे की, तत्काळ कृषी विरोधी कायदे मागे घेण्यात यावेत.” असं देखील राहुल गांधींनी ट्वटिद्वारे म्हटलं आहे.

या अगोदर काल दिल्लीत हिंसाचार घडत असताना देखील राहुल गांधी यांनी ट्विट करत, शेतकऱ्यांना शांततेचं आवाहन केलं होतं.

“हिंसेनं कोणत्याही समस्या सुटू शकत नाही”; राहुल गांधींचं शेतकऱ्यांना शांततेचं आवाहन

“हिंसा कुठल्याही समस्येचं उत्तर नाही. जखम कुणालाही होवो नुकसान आपल्या देशाचचं होणार आहे. देशहितासाठी कृषी विरोधातील कायदे मागे घेण्यात यावेत.” असं राहुल गांधी म्हणाले होते.

दिल्लीतील हिंसाचार प्रकरणी लक्खा सिधानाचंही नाव समोर

दरम्यान, काल ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागल्यानंतर शेतकऱ्यांनी लाल किल्ल्यावर निशाण ए साहिब ध्वज व शेतकरी संघटनांचे झेंडे फडकवले होते. शेतकऱ्यांना चिथवण्यामागे कोण आहे याच शोध घेतला जात असताना, दीप सिद्धू व लक्खा सिंह सिधाना ही दोन नावं समोर आलेली आहेत.