मलेशियातील पुलाऊ कुकुप या बंदराजवळ ‘एमटी सामुदेरा’ या तेलवाहू जहाजाला लागलेल्या आगीत एक भारतीय खलाशी बेपत्ता झाला असून, त्याचा मृत्यू झाला असावा, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. या आगीत अडकलेल्या 22 जणांना वाचवण्यात आले असून, त्यांना कुकुप येथील सागरी पोलिस चौकीत आणण्यात आले आहे. वाचवण्यात आलेल्या दोन खलाशांची प्रकृती चिंताजनक आहे.
बांगलादेशमधील चितगाव येथून निघालेले हे जहाज इंडोनेशियातील बातम येथे चालले होते. या जहाजातून तेल वाहून नेले जाते, मात्र आग लागली त्यावेळी ते रिकामे असल्याची माहिती ‘मलेशिया सागरी सुरक्षा अमलबजावणी यंत्रणे’ने दिली.