परदेशी संस्थांची भारताला मोफत सेवा
भारतात मान्सून स्थिर होण्याचा अंदाज सध्याच्या प्रणालीपेक्षा दोन आठवडे आधी देता येईल, असे वैज्ञानिकांनी सांगितले. पश्चिम घाट व उत्तर पाकिस्तानातील तापमानात होत असलेल्या बदलांमुळे मान्सून केरळात केव्हा स्थिर होणार व त्याची प्रगती कशी होणार हे बरेच आधी सांगता येणार असल्याचा दावा वैज्ञानिकांनी केला आहे.
परदेशी संस्था मान्सून स्थिरीकरण व मान्सूनचा परतीचा प्रवास याबाबतचे अंदाज भारताला मोफत उपलब्ध करून देणार आहेत. या माहितीचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.
भारतीय हवामान खाते मे महिन्याच्या अखेरच्या आठवडय़ात मान्सून केव्हा येणार हे सांगत असते. यात मान्सून जूनमध्ये प्रत्यक्षात स्थिर होतो.‘आता वर्षांच्या सव्वाशेव्या दिवशी म्हणजे ५ मे रोजी मान्सून केरळात नेमका केव्हा स्थिर होईल याचा अंदाज दिला जाणार आहे. उत्तर पाकिस्तानातील तापमानाच्या आधारे जुलैच्या मध्यावधीत मान्सून परतीचा अंदाज दिला जाईल’ असे पोस्टडॅम इन्स्टिटय़ूट ऑफ क्लायमेट इंपॅक्ट रीसर्च व युनिव्हर्सिटी ऑफ झुरिचच्या संशोधक व्हेरोनिका स्टोलबोवा यांनी म्हटले आहे. ‘आम्ही मान्सून अंदाजाबाबत भारतीय हवामान विभागाच्या संपर्कात आहोत व भारतीय उष्णकटिबंधीय हवामान संस्थेशी आमचा संपर्क आहे, उद्याच याबाबत लेखी संदेश भारतीय हवामान विभागाला पाठवला जाणार आहे असे त्या म्हणाल्या.