पंजाब नॅशनल बँकेतला घोटाळा ताजा असतानाच आता तामिळनाडूमध्ये बँकांमध्ये 824.15 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचे समोर आले आहे. 14 राष्ट्रीय बँका व एक खासगी बँक अशा 15 बँकांना कनिष्क गोल्ड या लोकप्रिय भूपेश कुमार जैनच्या ज्वेलरी कंपनीनं गंडा घातल्याचे समोर आले आहे. या घोटाळ्यातही पंजाब नॅशनल बँक व स्टेट बँकेला फटका बसल्याचे सांगण्यात येत आहे.

बँकांच्या या गटानं स्टेट बँकेच्या माध्यमातून सीबीआयकडे तक्रार दाखल केली आहे. कनिष्क गोल्ड प्रा. लि,ने 824.15 कोटी रुपयांना बँकांना गातलं असून तपास करावा अशी मागणी सीबीआयकडे करण्यात आली आहे, असं वृत्त इंडिया टुडेनं दिलं आहे. कनिष्कचं कार्यालय चेन्नईमध्ये असून भूपेश कुमार जैन व त्याची पत्नी नीता जैन हे प्रवर्तक व संचालक आहेत. हे दोघंही मॉरिशसला पळून गेले असल्यचा संशय असून दोघंही संपर्कात नसल्याचे स्टेट बँकेने म्हटले आहे.

कनिष्क गोल्डच्या संचालकांनी लेखापरीक्षकांसी संगनमत करून बँकांना फसवण्याच्या उद्देशानेच घोटाळा केल्याचा आरोप एसबीआयनं केला आहे. कंपनीच्या आर्थिक स्थितीसंदर्भात दिशाभूल करणारी माहिती देण्यात आल्याचेही नमूद करण्यात आले आहे. एसबीआयच्या तक्रारीनुसार कनिष्क गोल्डला 2007 नंतर कर्ज देण्यात आलं. कालांतरानं कनिष्कनं खेळत्या भांडवलाची मुदत वाढवून घेतली. 2011 मध्ये अनेक बँका कर्जासाठी पुढे आल्या ज्यामध्ये पंजाब नॅशनल बँक व बँक ऑफ इंडिया होत्या. 2012 मध्ये एसबीआयच्या नेतृत्वाखालील बँकांच्या समूहानं मेटल ग्रँट लोनची सुविधा कनिष्कला दिली.

नंतर कनिष्कची कर्जाची मर्यादा वाढवण्यात आली. ल्चेच बँकेने 215 कोटी रुपये, पंजाब नॅशनल बँकेने 115 कोटी रुपये, बँक ऑफ इंडियानं 45 कोटी रुपये, आयडीबीआयनं 45 कोटी रुपये, युको बँकेने 40 कोटी रुपये असे विविध बँकांनी कनिष्कला कर्जे दिली.

आधी मार्च 2017 मध्ये कनिष्कनं आठ बँकांचा कर्जाचा हप्ता भरला नाही. आणि एप्रिल 2017 पासून तर कनिष्कनं 14च्या 14 बँकांचे हप्ते थकवले.मे महिन्यामध्ये बँकांच्या अधिकाऱ्यांनी कनिष्कच्या पत्त्यांवर संपर्क साधला असता, कुणीही आढळलं नाही. एसबीआयच्या तक्रारीनुसार त्याचदिवशी म्हणजे 27 मे 2017 या दिवशी भूपेश कुमार जैननं 2009 नंतरचे रेकॉर्ड बनावट असल्याचं पत्र लिहिलं. कनिष्क ही घोटाळाबाज कंपनी असल्याचे व 14 बँकांना गंडा घातल्याचे एसबीआयनं नोव्हेंबरमध्ये रिझर्व्ह बँकेला कळवलं. कनिष्क गोल्ड व तिच्या प्रवर्तकांविरोधात लवकरच गुन्हा दाखल करण्यात येईल असं सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.